जळगाव (प्रतिनिधी) – प्रभाग क्रमांक ९ मधील चंदू अण्णा नगर चौफुली परिसरात सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती (लिकेज) झाल्याची बाब समोर आली आहे. या पाईपलाईनद्वारे साईनगर, गिरणाई कॉलनी, चंदू अण्णा नगर, द्वारका नगर, संत गजानन कॉलनी, शिवधाम मंदिर परिसर, अहुजा नगर आणि निमखेडी या भागांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या लिकेजचा परिणाम हजारो नागरिकांवर होत आहे.
सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या मते, त्या ठिकाणी मच्छी विक्रेते बसत असल्याने घाण वाढत असून साचलेल्या पाण्यामुळे आरोग्याचा धोका अधिक गंभीर झाला आहे. हेच पाणी पुढे घरांपर्यंत पोहोचत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या समस्येचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिलांना बसत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत चिंताजनक बनली आहे.
ही बाब प्रभाग क्रमांक ९ समस्या ग्रुपमध्येही समोर आली असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. संदीप पाटील यांनी या समस्येकडे विशेष लक्ष देऊन ती सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे समजते.
स्थानिक नागरिकांनी संबंधित पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग तसेच नगरसेवकांनी या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन पाईपलाईनची दुरुस्ती करावी आणि परिसरात स्वच्छतेची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन ही समस्या लवकरात लवकर निकाली काढावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.















