मुंबई (वृत्तसंस्था) मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात केलेले वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद पेटला आहे. तसेच या वक्तव्यावरून मनसेत मोठी फूट पडल्याचे दिसते. ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करीत मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी मनसेला रामराम ठोकले. मुंबई, मराठवाडा येथील मनसेतील सुमारे ३५ नाराज मुस्लिम कार्यकर्त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
मशिदींवरील भोंगे बंद न झाल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात केलं होतं. त्यानंतर ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेमध्ये या भूमिकेचा पुनरुच्चार करत राज ठाकरेंनी राज्य सरकारला भोंग्यांविषयी निर्णय घेण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र, त्यांच्या या भूमिकेला त्यांच्याच पक्षातील मुस्लीम बांधव पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
गुरुवारी मनसेचे कल्याणमधील प्रदेश सचिव इरफान शेख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला. यावेळी इरफान शेख यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट देखील टाकली. “आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’..!”, या मथळ्याखाली इरफान यांनी फेसबुकवर राजीनाम्याची पोस्ट लिहिलीय. “खरं तर कधी अशी परिस्थिती समोर येईल असं वाटलं नव्हतं. मात्र आपण ज्या पक्षात काम करतो, ज्या पक्षाला आपलं सर्वस्व समजतो तोच पक्ष जर आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाच्या विरोधात द्वेषात्मक भूमिका घेत असेल आणि स्वतः पक्षाध्यक्षच जर भूमिका घेत असतील तर नक्कीच पक्षाला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याची वेळ आली आहे,” असं स्पष्ट मत इरफान शेख यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केलं.
अनेक महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकाऱ्यांचा समावेश
यानंतर इरफान शेख यांच्याप्रमाणेच मनविसेचे सरचिटणीस फिरोज पी. खान यांच्यासोबत मुंबई व मराठवाडा विभागातील एकूण ३५ मुस्लीम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. फिरोज खान यांच्या सहीनिशी या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादीच राजीनामापत्रावर नमूद करण्यात आली आहे. यामध्ये सचिव, शहराध्यक्ष. प्रसिद्धी माध्यम प्रमुख, जिल्हा सचिव, वाहतूक सेना उपाध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
















