नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोदी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गरीब जनतेची हेळसांड होऊ नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्यात ५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा ८० कोटी नागरिकांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे गरीब जनतेला दिलासा मिळणार आहे.
या योजनेवर केंद्र सरकार २६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीबांच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने मार्च २०२० मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून दर महिन्याला दरडोई पाच किलो गहू अथवा तांदूळ मोफत देण्यात येत होतं. या योजनेतल्या जवळपास ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्यात आलं होतं. आता पुन्हा तीच स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. त्यामुळे संकटाच्या काळामध्ये पुन्हा एकदा सरकारनं दोन महिने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर २०२० पासून केंद्र शासनानं पंतप्रधान गरीब कल्याण योजना बंद केली होती. आता लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा राबवल्यानं गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.