मुंबई (वृत्तसंस्था) एनसीबी ही देशातील एवढी मोठी तपास संस्था आहे, त्यांच्याकडे अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरात आहे. तरीही त्यांना तंबाखू आणि गांजा यातील फरक कळू नये ही बाब फार गंभीर आहे, असा आरोप राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांना आज अमली पदार्थांच्या प्रकरणात जामिन मिळाला आहे. खान यांना सेलिब्रिटी मॅनेजर राहिल फर्निचरवाला आणि ब्रिटीश नागरिक करण सेजनानी यांच्यासह ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. यानंतर आता नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत जावई समीर खान याच्या अटकेसंदर्भात एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच एनसीबीने समीर खान यांचा जामिन रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.
याविषयी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, “१४ जानेवारी रोजी एनसीबीचे कर्मचारी माझ्या जावयाच्या घरी छापा मारण्यासाठी गेले. सर्व वृत्तवाहिन्यांवर दाखवले गेले की, मोठ्या प्रमाणावर गांजा सापडला. मात्र प्रत्यक्षात घरातून काहीच जप्त करण्यात आले नव्हते. तरीही मीडियाला खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचे षडयंत्र रचले गेले. मी सुरुवातीपासून हेच सांगत आलो होतो की, एनसीबी खोटे दावे करुन लोकांना बदनाम करण्याचे काम करत आहे,” असेही नवाब मलिक म्हणाले. “करण सजनानी, राहिला फर्निचरवाला, समीर खान यांना अडकवण्यात आलं आहे,” असं नवाब मलिक म्हणाले. अभिनेती रिया चक्रवर्तीच्या प्रकरणातही असेच झाले असल्याचा आरोपही मलिक यांनी यावेळी केला.
“८ जानेवारी २०२१ रोजी एनसीबीने पत्रकारांना सांगितले की, दोन पार्सल युनिव्हर्सल कार्गोतून ट्रेस केले गेले. ९ जानेवारी करण सजनानी जे वांद्रे येथे राहतात, त्यांच्या घरी छापा टाकला गेला. एनसीबीने अधिकृत प्रेस नोट काढून २०० किलो गांजा जप्त केल्याची बातमी दिली. त्याच दिवशी ९ जानेवारी रोजी एनसीबीच्या अधिकाऱ्याने आपल्या मोबाईल नंबरवरुन प्रेस नोट आणि चार फोटो पाठवले. एका ब्रिटिश नागरिकाला अटक केली असल्याचे या प्रेस नोटद्वारे सांगितले. ९ जानेवारी रोजी राहिला फर्निचरवाला नावाच्या मुलीकडे साडेसात ग्रॅम गांजा जप्त केला गेला. त्या मुलीला त्याच दिवशी जामीन मिळाला,” असं घटनाक्रम सांगताना मलिक यांनी सांगितलं.
“याच दिवशी देशभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली. १२ जानेवारी रोजी रात्री १० वाजता माझे जावई समीर खान यांना समन्स पाठविण्यात आले. १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे दहा वाजता माझे जावई समीर खान एनसीबी कार्यालयात पोहोचले. तिथे आधीपासूनच वृत्तवाहिन्याचे कॅमेर लागलेले होते. सर्व वृत्तवाहिन्यावर माझ्या जावयाचा फोटो लावून ते अमली पदार्थाशी संबंधित असल्याचे सांगितले गेले. अटक झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत एनसीबीने तीन महिने वेळ घालवला. दिनांक ९ जानेवारी रोजी एनसीबीने केलेल्या कारवाईची प्रेस नोट आणि जप्त केलेल्या अंमली पदार्थाचे फोटो एनसीबीचे अधिकाऱ्यांकडून मोबाईल नंबरवरुन पत्रकारांना फॉरवर्ड करण्यात आले होते. या फोटो आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या आधारावर मिडियाने बातम्या दिल्या. शेवटी कुणीही कितीही बातमी पेरली तरी त्याची खातरजमा पत्रकारांनी केली पाहिजे,” असे आवाहनही मलिक यांनी माध्यमांना केले.