जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील नशिराबाद ते मुक्ताईनगर चौपदरी रस्त्यांचे काम सुरू आहे, त्याची टोल वसुली आजपासून सुरु करण्यात येत आहे. मात्र. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने टोल नाका सुरू करण्यास विरोध केला आहे. तसेच टोल सुरू राहिल्यास तीव्र आंदोलन पक्षातर्फे करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अँड. रवींद्र पाटील यांनी दिलाय.
नशिराबाद ते मुक्ताईनगर असा चौपदरीकरण महामार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे, त्यातील काही भागाचे काम पूर्ण झाले, नशिराबाद ते भुसावळपर्यंत रस्त्याचे काही अंशी काम झाले आहे. मात्र, या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात काम बाकी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. आता याच रस्त्यावर नशिराबाद येथे आजपासून टोल नाका सुरू करण्यात येत असून त्याचे वाहनाचे दरही जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र हा टोल नाका सुरू होण्याच्या पूर्व संध्येला विरोधाचे हत्यार उपसले आहे. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने टोल नाका सुरू करण्यास विरोध केला आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अँड. रवींद्र पाटील यांनी सांगितले की, या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, मात्र, त्याची टोल वसुली सुरू करून जनतेला आतापासून भुर्दंड देण्यात येत आहे. ही वसुली अत्यंत चुकीची आहे. जनतेवर हा अन्याय आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने अगोदर या रस्त्याचे काम पूर्ण करावे त्यानंतर टोल घ्यावा मात्र आता टोल सुरू करण्यास आमचा तीव्र विरोध आहे. या बाबत आपण आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत, तरीही टोल सुरू राहिला तर तीव्र आंदोलन पक्षातर्फे करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.