
जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील आषाढी वारी ही भक्ती, समता आणि एकात्मतेचे प्रतीक मानली जाते. आषाढ महिना सुरू होताच लाखो वारकऱ्यांची पावले पंढरपूरच्या दिशेने वळतात. या शतकानुशतकांच्या वारी परंपरेचे प्रभावी रंगमंचीय दर्शन घडविणारे ‘पालखी’ हे नाटक परिवर्तनच्या कलावंतांनी आषाढीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सादर केले. या प्रयोगाला जळगावकर रसिकांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद लाभला.
दि. बा. मोकाशी यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित या नाटकाचे नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले आहे. वारीतील भक्ती, समता, लोकसंस्कृती आणि अध्यात्म यांचा प्रभावी आविष्कार या नाटकातून साकारण्यात आला.
जळगावच्या रसिक प्रेक्षकांना हा सांस्कृतिक ठेवा अनुभवता यावा यासाठी नवजीवन प्लस, अरिहंत डेव्हलपर्स, सातपुडा ऑटोमोबाईल्स, महावीर क्लासेस, छबी इलेक्ट्रिकल्स आणि नवरंग चहा यांनी पुढाकार घेत नाटकाचा विनामूल्य प्रयोग आयोजित केला.
प्रयोगाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते विठ्ठल प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, पोलीस निरीक्षक श्रीकांत ढेवरे, ज्योती जैन, मुख्य अभियंता आर. एम. मोरे, दीनानाथ शिंदे अमरभाई खत्री, नंदू भाई अडवाणी, ॲड. सुशील अत्रे, तसेच परिवर्तन प्रेक्षक सभासद योजनेचे प्रमुख अनिश शहा, अनिल कांकरिया, अमर कुकरेजा, नंदलाल गादिया, छबीराज राणे, किरण बच्छाव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन शंभू पाटील यांनी केले. विठ्ठलाच्या पूजनानंतर नाटकाला सुरुवात झाली.
परिवर्तनच्या तब्बल ४५ कलावंतांनी या नाटकात सहभाग घेत वारीचे जिवंत दर्शन घडविले. अभंग, भारूड, कीर्तन, रिंगण आणि वारकरी परंपरेतील विविध सांस्कृतिक पैलूंचे प्रभावी सादरीकरण पाहून प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले.
नाटकाची निर्मिती विनोद पाटील व रंगकर्मी वसंत गायकवाड यांची होती.
नाटकाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संपूर्ण सभागृहासह बाल्कनीही प्रेक्षकांनी खचाखच भरली होती. अनेक रसिकांना आसन उपलब्ध न झाल्याने त्यांचा हिरमोड झाला आणि काहींना नाटक न पाहताच परत जावे लागले. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे जळगावकरांनी वारकरी परंपरेवर आधारित या नाटकाला भरभरून दाद दिल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
















