धरणगाव (प्रतिनिधी) मागील काही महिन्यांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे शहरातील महात्मा फुले नगरमधील नागरिकांना पाण्याच्या प्रचंड तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. आज साधारण २१ दिवसानंतर पाणी पुरवठा झाला. परंतू कमी दाबाने पाणी सोडल्यामुळे पाणी भेटलेच नाही, असा आरोप करत परिस्थिती सुधारली नाही. तर नगर पालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
शहरातील महात्मा फुले नगरमध्ये २१ दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात आला. सकाळी आठ वाजेच्या सुमारास पाणी सोडण्यात आले होते. परंतू अनेक नळांना पाणीच येत नव्हते. अर्धवट पाणी आल्याने नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत होते. नगरपालिकेकडे वारंवार निवेदन देऊन देखील समस्या सूटली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आम्ही घरपट्टी, पाणीपट्टी नियमित भरतो तरी देखील आम्हाला पाणी मिळत नाही. रस्ता मंजूर असून रस्ता होत नाही. दुसरीकडे गावातील पेव्हर ब्लॉकचे काम मात्र जोरात सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या सहा वर्षापासून महात्मा फुले नगरात रस्ता मंजूर असूनही काम सुरु होत नाही. गटारी, हायमस्ट लाईटची सुविधा नाहीत. याभागात कुठलीही सोयीसुविधा नगरपालिकेने केलेल्या नाहीत.
दरम्यान, शहरात गेल्या वीस ते बावीस दिवसानंतर पाणीपुरवठा होतोय. परंतु तो देखील अशुद्ध पाणी नळाला येत असल्याचे चित्र आहे. नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून फिल्टर प्लांट केवळ नावालाच आहे का?, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. तसेच हिवाळ्यात वीस ते पंचवीस दिवसानंतर पाणीपुरवठा होत होता. मात्र आता उन्हाळा सुरु असून आजही हीच परिस्थिती दिसून येत आहे.
पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. आम्ही करायचे काय?, हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. आज २१ दिवसानंतर पाणी आले. मात्र, साधी दोन ड्रम देखील भरले गेले नाहीत. एकदम हळुवार पद्धतीने पाणी पुरवठा होत होता. असे स्थानिक रहिवासी सुकेतन महाजन यांनी पाण्याच्या समस्येबद्दल सांगितले.
या परिसरात १९८८ पासून आम्ही रहिवासी राहतोय. परंतू या भागात कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा उपलब्ध झालेली नाही. साधं पाणी देखील वेळेवर मिळत नाही. घरपट्टी, पाणीपट्टी आम्ही नियमित भरतो. अनियमित पाणी पुरवठ्याबाबत आम्ही वारंवार रहिवाशांनी नगरपालिकेला निवेदन दिले असून आमची दखल घेतली जात नाही. आता पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आम्ही नगरपालिके समोर उपोषण करू !, असा इशारा स्थानिक रहिवासी संदीप पाटील यांनी दिला आहे.