चोपडा (प्रतिनिधी) या जगातून निघून गेलला व्यक्ती परत कधीच येत नाही. परंतू हा चमत्कार मजरे हिंगोणा ग्रामपंचायमध्ये घडला आहे. एवढेच नव्हे तर, मयत व्यक्तींच्या नावावर पैसे काढण्यात आली असून चौकशी केल्यास मोठा भ्रष्टाचार बाहेर निघण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे. याबाबत आपण गटविकास अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सुधाकर सुर्यवंशी यांनी याबाबत आज पत्रकारांना माहिती देतांना सांगितले की, तालुक्यातील मजरे हिंगोणा येथील ग्रामपंचायतीत पंचायतराजचे आलेले पेमेंट मयताच्या नावावर काढून मोठा भ्रष्टाचार केला आहे. ज्या व्यक्तींना मयत होवून पाच ते दहा वर्ष होऊन गेली आहे, अशांच्या नावाने सर्रास पेमेंट काढली गेली आहेत. त्यामुळे काढलेले पैसे कुणाच्या घशात गेली ?, याचा शोध घेणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी देखील सुर्यवंशी यांनी केली आहे.
पंचायतराज योजनेत कामाला आलेले पोपट यादव पाटील 16/10/2009 ला मयत झाले आहेत. तरी त्यांच्या नावावर व्हाऊचर क्रमांक OWN/2022– 23/R/64 ह्या व्हाऊचरने दि.08/2/2023 रोजी 5726/- रुपये रोख काढले आहेत. तसेच व्हाऊचर OWN/2022– 23/R/53 ह्या व्हाऊचरनेही रोख 5025/- रुपये काढण्यात आले आहेत. यात एकूण 10751/- रुपये रोख काढण्यात आली आहेत. तसेच पितांबर दौलत धिवर हे 19/9/2014 ला मयत झाले आहे त्यांचा नावे व्हाऊचर क्रमांक OWN/2022–23/R/2 यातून 1800 /- रोख काढण्यात आले आहे. तर OWN/2022–23/R/3 हया व्हाऊचर द्वारें 2306/- रुपये रोख काढण्यात आले आहे. व उत्तमराव बाबूराव पाटील हे दि.5/4/2013 ला मयत झाले आहेत. ह्यांच्या नावावर व्हाऊचर क्रमांक OWN/2022–23/R/20 ह्या व्हाऊचर द्वारे 3100/- रुपये रोख काढण्यात आले आहे.
ग्रामपंचायतने असे किती व्हाऊचर तयार केली? आणि किती पैसे काढण्यात आले?, याची सखोल चौकशी केली तर लाखों रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर येऊ शकतो. भ्रष्टाचार करणाऱ्या जो कोणी असेल त्याला वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पाठिशी न घालता संबंधितांना शिक्षा व्हायलाच हवी अशी मागणी देखील प्रसाद सूर्यवंशी यांनी केली आहे.
प्रसाद सूर्यवंशी यांनी हे प्रकरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या लक्षात आणून दिले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा दि.27/9/23 ला तक्रार दिली आहे. मात्र, साधी चौकशी सुद्धा केली नाही. दरम्यान, मजरे हिंगोणा या ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण हे चक्क चोपडा येथील विश्रामगृहावर सुरू होते. त्यावेळी देखील काही वृत्तपत्रानी बातम्या लावल्या होत्या. मात्र त्यावेळेस अधिकाऱ्यांनी संबंधित इसमाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घातले तर लाखो रुपायांची अफरातफर निघू शकते. तसेच त्यांच्याकडून पैसे वसूल करून संबंधितांनावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी अशी मागणी देखील प्रसाद सूर्यवंशी यांनी केली आहे.