मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईत शिवाजी पार्कवर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. या सोहळ्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी राज यांनी उपस्थित असलेल्या तमाम मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि एक शपथ देखील दिली. छत्रपती शिवरायांनी एका स्वाभिमानी स्वावलंबी स्वराज्याचं स्वप्न आम्हाला दिलं आहे. त्याचं स्मरण ठेवून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करत राहू”, अशी शपथ राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आज दादर येथील शिवाजी पार्कात मनसेने जयंतीचा मोठा सोहळा आयोजित केला होता. या दिमाखदार सोहळ्याला हजारो मनसैनिक उपस्थित होते. संपूर्ण परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. यावेळी हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित सर्व मनसैनिकांना शपथ दिली.
मनसेने आज शिवाजी पार्कवर तिथीप्रमाणे शिवजयंती सोहळ्याचं आयोजन केलं आहे. या सोहळ्यासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती. या निमित्ताने शिवाजी पार्क परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते. तसेच मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भगवे फेटे बांधले होते. काही मनसे कार्यकर्ते तर भगवे कपडे परिधान करून आले होते. यावेळी भगवे झेंडे उंचावत ढोलताशाच्या दणदणाटात मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जय भवानी, जय शिवरायच्या घोषणांनी संपूर्ण शिवाजी पार्क परिसर दुमदुमून गेला होता.
राज यांनी दिली प्रतिज्ञा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना प्रतिज्ञा दिली. शिवजयंती निमित्त आपण सर्व शिवतिर्थावर जमलो आहोत. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. शिवजयंती निमित्ताने सर्वांना एक पक्षातर्फे शपथ देणार आहे, ती शपथ माझ्या बरोबरीने बोलायची आहे.
“आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शपथ घेतो की, स्वराज्याच्या उभारणी नंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला, त्याला अनुसरून महाराष्ट्रात सुराज्य व्हावं म्हणून सर्व जण प्रयत्नांची पराकष्ठा करू. हे सुराज्य स्थापन करताना जातीजातीत हरवलेला समाज पुन्हा एक होईल, राज्यात महिलांना सुरक्षित वाटेल, त्यांचा आत्मसन्मान राहील, युवकांच्या हाताला चांगला रोजगार मिळेल. इथलं प्रत्येक मुल शाळेत जाऊन शिकत असेल. लोकांना परवडेल अशी दर्जेदार आरोग्य व्यवस्था मिळेल. इथली शहरं, गावं, पाडे, तांडे सुंदर सुखर आणि सुरक्षित असतील. भ्रष्टाचार नष्ट होईल. आमच्या शेतकरी बंधु भगिनींना, त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल, कामगारांना न्याय मिळेल यासाठी जे पडेल ते करू.
छत्रपती शिवरायांनी एका स्वाभिमानी स्वावलंबी स्वराज्याचं स्वप्न आम्हाला दिलं आहे. त्याचं स्मरण ठेवून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजन्म काम करत राहू. आम्ही महाराजांचे मावळे आहोत. सैनिक आहोत. याचा आम्हाला कधीही विसर पडणार नाही. हे वचन देऊन आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आमची सर्व निष्ठा त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वाहतो आणि महाराष्ट्र धर्माशी एकनिष्ठता व्यक्त करतो.”