मुंबई (वृत्तसंस्था) मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाचे खासदार नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रीपद जाहीर झाल्यापासूनच राणेंना अनेकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. मात्र नारायण राणे आणि त्यांच्या मुलाचा फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही, पण राणे यांना पुन्हा संपर्क करुन शुभेच्छा देईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. याचरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळल्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर मी नारायण राणे आणि त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर फोन केला होता. मात्र त्यावेळी दोघांचाही फोन बंद होता. त्यामुळे संपर्क झाला नाही. मात्र येत्या दोन-तीन दिवसांत पुन्हा संपर्क करुन नारायण राणे यांना शुभेच्छा देईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांचं मन एवढं मोठं नाही – नारायण राणे
तत्पूर्वी, नारायण राणेंना मंत्रिपद जाहीर केल्यापासून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच, ‘शरद पवार यांनी मला फोन केला, चांगलं काम करा, असे ते म्हणाले. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप मला शुभेच्छा दिलेल्या नाहीत. कारण त्यांचं मन एवढं मोठं नाही. मला मंत्रीपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलेले नाही. मात्र, महाराष्ट्रातील सर्व विभागातून मला शुभेच्छा मिळाल्या, त्याच मी त्यांच्या वतीने शुभेच्छा समजतो, असेही नारायण राणेंनी म्हटले.
















