अकोला (वृत्तसंस्था) शेतीच्या क्षुल्लक वादातून अकोट तालुक्यातील देऊळगाव गावंडे येथील एका शेतकऱ्याची सख्ख्या मोठ्या भावाने व पुतण्याने संगणमत करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
अकोट तालुक्यातील देऊळगाव गावंडे येथील रहिवाशी ज्ञानेश्वर बापूराव गहले (वय ५२ वर्ष) यांचे मोठ्या भावाशी शेतीच्या कारणावरून नेहमी वाद होते. यामुळे दोन्ही कुटुंबीयांमध्ये क्लेश निर्माण झाला होता. दरम्यान ज्ञानेश्वर गहले हे शेतात एकटेच काम करीत असल्याचे समजल्यावर त्यांचा मोठा भाऊ सुरेश बापूराव गहले व पुतण्या शुभम गहले या दोघांनी कुऱ्हाडीने व पाईपने हल्ला चढविला.
यामध्ये ज्ञानेश्वर गहले गंभीर जखमी झाले. त्यांना नातेवाईकांनी प्रथम उपचाराकरता अकोट येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतू त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविले असता अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे रात्री दहा वाजताच्या सुमारास ज्ञानेश्वर गहले यांनी अखेरचा श्वास घेतला.
या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मृतकाची पत्नी अर्चना गहले यांच्या तक्रारीवरून सुरेश बापूराव गहले व शुभम सुरेश गहले यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेपासून दोघेही फरार असून त्यांच्या शोधार्थ पोलीसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
मोठा भाऊ सुरेश गहले व ज्ञानेश्वर गहले यांचे वडील बापूराव गहले यांचे गतवर्षी ऑगस्ट महिन्यात निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या चार एकर शेतीवरून दोन भावांमध्ये वाद सुरू झाले. ज्ञानेश्वर गहले हे वडिलोपार्जित शेती करीत असल्याने सुरेश गहले हा नेहमीच वाद घालून जिवे मारण्याची धमकी द्यायचा. परंतु कौटुंबिक वाद असल्याने ज्ञानेश्वर गहले यांनी या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली नव्हती.