जळगाव (प्रतिनिधी) महावितरण कंपनीकडे पाठपुरावा करुनही वीज कनेक्शन मिळत नसल्याने पाण्याअभावी पिके जळत आहेत. त्यामुळे वीज कंपनीच्या कारभाराला कंटाळून योगराज प्रल्हाद पाटील (रा. सात्री ता.अमळनेर) या शेतकऱ्याने आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला आहे.
अमळनेर तालुक्यातील सात्री येथील रहिवासी योगराज पाटील हे शेतकरी असून त्यांच्याकडे दहा बिघे एवढी शेती आहे. शेतीत मक्याचे पीक लावले आहे. शेतात वीज कनेक्शन मिळावे त्यासाठी तब्बल दहा महिन्यांपासून महावितरण कंपनीकडे पाठपुरावा करत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले होते त्यांनी कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही कुठलीही कार्यवाही आत्तापर्यंत झालेली नाही. दुसरीकडे वीज कनेक्शन नसल्याने पिकांना पाणी देता येत नाहीये. त्यामुळे पीक जळत आहे. होणारे नुकसानामुळे व महावितरण कंपनीचा कारभाराला कंटाळुन योगराज पाटील या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्वतःवर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हापेठ पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला सोडून देण्यात आले.