मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथराव खडसे यांचे पुनर्वसन कसे करायचे ते शरद पवार ठरवतील, अफवा नको, ज्यावेळेस प्रवेश करण्याचे ठरविले जाते, त्यावेळेस हे निर्णय होत असतात. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेतात याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे, अशी सूचक प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतर जयंत पाटील म्हणाले की, खडसे यांच्यासोबत त्यांचे समर्थकही आहेत. सध्या खडसे प्रातिनिधिक स्वरुपात प्रवेश करतील. त्यांच्या पुनर्वसनाची चिंता कोणीही करू नये. तसेच कोणत्याही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या अफवा पसरवू नका. या चर्चांना पूर्णविराम दिला तर बरं होईल. एकदा प्रवेश केल्यावर पक्ष संघटना वाढवण्याबाबत विचार होईल, असेही श्री. पाटील म्हणाले. खडसे यांच्या समवेत त्यांच्या काही संस्थेतील लोकांसह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हातले काही लोक प्रवेश करतील असेही ते म्हणाले.
















