जळगाव (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपने शिवसेनेचा विश्वासघात केला. आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये या विश्वासघातकी भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार आज झालेल्या शिवसेनेच्या जिल्हा बैठकीत करण्यात आला.
बैठकीत मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील म्हणाले की, येणारा खासदार शिवसेनेचा असेल एवढी ताकद आपली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातही आपले दोन आमदार आहेत. ग्रामपंचायत निवडणुका कशा लढायच्या, हे सांगायची शिवसैनिकाला गरज नाही. म्हणूनच वर्षानुवर्षे पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर आपले प्रतिनिधी प्रतिनिधित्व करत आहेत. ग्रामपंचायत निवडणूक जास्तीत जास्त बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करा. पुढे जाऊन जिल्हा परिषदेची निवडणूक होईल, त्यात आपल्या ताकदीचा फायदा होईल. ग्रामपंचायत निवडणूक ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तसेच पक्षाच्या ताकद वाढीची रंगीत तालीम आहे, असे मानून चाला. पुढची जिल्हा परिषद महाविकास आघाडीच्या ताब्यात असेल, असा दावाही गुलाबराव पाटील यांनी केला.
जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुक लढविण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, लता सोनवणे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, नगरसेवक नितीन बरडे, प्रशांत नाईक, अनंत जोशी आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवून आणा- चिमणराव पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका वर्षात चांगले नाव कमावले आहे. त्यांच्या कार्याची दखल सर्वत्र घेतली जात आहे. आपल्या नेत्याच्या कामाची पद्धत लक्षात घेऊन आपणही जनसेवा केली पाहिजे. यापुढे आपल्याला पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत. म्हणून ग्रामपंचायतीवर सत्ता आणणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री आपले आहेत, याचा फायदा घ्या. ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवून आणा, असे आवाहन चिमणराव पाटील यांनी केले.
दिलदार शत्रू बरा- किशोर पाटील
जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकेल, या पद्धतीने काम करण्याची गरज आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जरूर प्रयत्न करू. पालकमंत्री आपले आहेत. काही ठिकाणी आमदारही आपले आहेत. अशा परिस्थितीत आम्ही निधी कसा द्यायचा? हा प्रश्न असल्याने ग्रामपंचायतीत सत्ता आणणे गरजेचे आहे. आजवर आपण भाजपसोबत होतो. पण भाजपने आपला विश्वासघात केला आहे. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, असेच म्हणावे लागेल. आपला प्रमुख शत्रू भाजप आहे, हे लक्षात घ्या, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.