मुंबई (वृत्तसंस्था) औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरु आहेत. कॉंग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी या नामांतरणाला विरोध करताना म्हटलं की, “संभाजीनगर नाव करण्याला आमचा विरोध असेल. महाविकास आघाडी विकासाच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आली आहे. सरकारनं सामान्य माणसाचं जीवन सुखी कसं होईल हे पाहायचं, हा कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या मुख्य हेतू आहे.
औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. आता लवकरच शिवसेनेचं स्वप्न सत्यात येणार असल्याचं दिसत असताना महाआघाडीतील प्रमुख घटक कॉंग्रेसने या नामांतरणाला विरोध केला आहे. शिवसेनेकडून औरंगाबादचा कायमच संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. गेली कित्येक वर्षे औरंगाबादच संभाजीनगर नामकरण करण्यासाठी राजकारण सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा दौरा केला. त्यांच्या दौऱ्याची माहिती देताना सीएमओच्या ट्वीटमध्ये संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, “नाव बदलण्याचा हा अजेंडा आम्हाला मान्य नाही .नाव बदलावर काँग्रेसचा विश्वास नाही. शहराच्या नावात बदल करुन काही होत नाही, काही गोष्टींचा इतिहास बदलू शकत नाही. आम्ही विकासाची वाटचाल सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून करत आहोत, हे आमचे सूत्र आहे आणि हे राज्य घटनेच्या मूलभूत तत्त्वांना धरुन आहे. शहराच्या नावात बदल करणे ही गोष्ट आम्हाला मान्यच नाही. या प्रस्तावाला निश्चितच आमचा विरोध राहणार.”
















