नवी दिल्ली (प्रतिनिधी) आपल्या मेहुणीसोबत लग्न करण्यासाठी एकाने आपल्या आपल्या चारही मुलींना पाण्यातून विष देत त्यांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, बाडमेर जिल्ह्यातील शिव ठाणा क्षेत्रातील पोशाल नवपुरा गावात राहणाऱ्या पुरखारामचं दहा वर्षाआधी पप्पू नावाच्या महिलेसोबत लग्न झालं. त्यांना चार मुली होत्या. मात्र, याचवर्षी जून महिन्यात आरोपीच्या पत्नीचा कोरोनानं मृत्यू झाला. यामुळे आरोपी दुसरं लग्न करण्यासाठी तो आपल्या मेहुणीसोबतच लग्न करणार असल्याचा हट्ट करत होता. परंतू सासरची मंडळी याला तयार नव्हती. मेहुणीचं लग्न दुसरीकडे ठरलं असल्यानं ती तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. अशात चार मुलांचा बाप असलेल्या माणसाला मुलगी कोण देणार? त्यामुळे, त्यानं आपल्या चारही मुलींचा जीव घेण्याचा निर्णय घेतला. पत्नीच्या मृत्यूनंतर पुरखारामच्या चारही मुली आपल्या मामाच्या घरी होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसाआधी आरोपी पुन्हा आपल्या सासरी गेला. तिथे जाऊन त्यानं पुन्हा लग्नासाठी हट्ट केला. सासरकडच्या लोकांनी त्याला समजावलं की दुसरीकडे तुझं लग्न लावून देईल. यानंतर तो शुक्रवारी सकाळी चारही मुलींना घेऊन आपल्या घरी आला. इथे त्यानं पाण्यात कीटकनाशक मिसळून ते आपल्या मुलींना पिण्यासाठी दिलं आणि त्यांची हत्या केली. यामुळे आपल्याला तुरुंगात जावं लागेल या भीतीनं त्यानंही विष प्राशन केलं आणि पाण्यात उडी घेतली.