प्रयागराज (वृत्तसंस्था) प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या (brutal murder) झाल्याने खळबळ उडाली आहे. राहुल तिवारी, त्यांची पत्नी प्रिती आणि तीन मुलींची हत्या करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोशांबी येथील हे कुटुंब नवाबगंज येथील खागलपूर गावात भाड्याच्या घरात राहत होते. हत्येची माहिती मिळाल्यावर नवाबगंज ठाणे पोलीस तत्काळ घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले. फॉरेन्सिक एक्स्पर्ट्स आणि डॉग स्क्वॉडला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल रात्रीची आहे. सकाळी घराचा दरवाजा बंद होता. बराच वेळ घरातून काही हालचाल दिसत नसल्याने शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी दरवाजा ठोठावून पाहिला. मात्र दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता राहुल यांचा मृतदेह हा लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर राहुल यांची पत्नी आणि तीन मुलींचे मृतदेह बेडवर पडले होते. त्यांचा गळा कापून हत्या करण्यात आली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन शोक जाहीर केला आहे. तसेच अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून निष्पक्षपणे तपास करून दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.