मुंबई (वृत्तसंस्था) त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असताना राजकारण तापताना दिसत आहे. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ईडी, एसीबी, सीबीआय वापरुनही राज्य अस्थिर होत नसल्याचं पाहून हे दंगलीचं कारस्थान रचलं जात आहे. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
भाजप जातीय दंगली, धार्मिक दंगलीशिवाय राजकारण करुच शकत नाही, भाजपच्या माध्यमातून दंगली घडवल्या जात असतील तर गृह मंत्रालय सक्षम आहे, सरकार सक्षम आहे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचं मोठं कारस्थान आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या माध्यमातून सरकारला काय चरोट्या उठत नाही, आम्ही मनाने आणि कामाने खंबीर आहोत. आता दंगली घडवून अस्थिरता निर्माण करण्याचं यांचं कारस्थान दिसतंय. मराठवाड्यात, औरंगाबादच्या काही भागात, अमरावतीत असे प्रकार झाले, हे ठरवून झालं आहे. या राज्यातील विरोधी पक्षाने महाराष्ट्राल अशाप्रकारे चूर लावण्याचा प्रकार करु नये, महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला धक्का लावू नका. अमूक खातं कुणाकडे हे महत्त्वाचं नाही, महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. ते महत्त्वाचं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
दंगलखोरांचा बुरखा फाटेल, खरे दंगलखोर वेगळेच आहेत. मांजर डोळे मिटून दूध पित असलं तरी असे प्रकार कळतात. राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, कायदा सुव्यवस्था बिघडवणं आणि राज्यपालांकडे निवेदन द्यायचं, हा खेळ आता जुना झाला, आम्ही माहीर आहोत. रजा अकादमीची एवढी ताकद नाही, चार टाळकी नाहीत त्यांच्याकडे, त्याच्यामागे वेगळेच लोक आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.