मुंबई (वृत्तसंस्था) वाह प्रशासन! बार आणि दारूची दुकानं सुरू आहेत. मग मंदिरं डेंजर झोन आहेत का? काही जण नियमावली लागू करण्यात असमर्थ ठरतात, त्यावेळी त्यांना प्रमाणपत्राची आवश्यकता असते,’ अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले होते. त्यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली होती. राज्यपालांच्या या पत्राला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तुमच्याकडून हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे म्हटले होते. आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनीही उडी घेतली आहे. अमृता फडणवीसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, वाह प्रशासन! महाराष्ट्रात दारुची दुकानं, शॉप्स सगळीकडे सुरु झाली. मग मंदिरं काय धोकादायक क्षेत्रामध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते! असे ट्विट अमृता फडणवीसांनी केले आहे.