मुंबई (वृत्तसंस्था) जळगाव आगारातील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे महामंडळाकडून तातडीने एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन आणि दिवाळी अग्रीम रक्कम आज दिली जाणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.
अनिल परब यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी महिन्याभराचे वेतन देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. पुढील तासाभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. उरलेले थकीत वेतन हे लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल, त्यासाठी कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही परब यांनी स्पष्ट केले. ‘एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सारखे कठोर पाऊल उचलू नये. तात्पुरत्या संकटातून आपण नक्की मार्ग काढू. पण दुःखी होऊन असे कोणतेही टोकाचं पाऊल उचलू नये, असे आवाहनही परब यांनी सर्व कर्मचाऱ्यांना केले.
‘एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी बँकेकडे कर्ज पण मागितले आहे. टप्प्या- टप्प्याने सगळ्या गोष्टी होतील. राज्य शासनाकडेही पैसे मागितले आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. आता एसटीसाठी कोणतीही रक्कम थकीत नाही. राज्य शासनाला प्रस्ताव दिला असून काही दिवस तरी कर्मचाऱ्यांना पगार द्यावे’, अशी मागणीही परब यांनी केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी असलेले आणि एस मंडळात वाहक पदावर काम करत असलेल्या मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली होती.