नागपूर (वृत्तसंस्था) भानेगाव बिना कोळसा खाणीत कोळसा काढणाऱ्या एका कंपनीचे पाच कामगार कन्हान नदीत मासे पकडण्यासाठी गेले असता पाण्याच्या प्रवाहात वाढ झाल्याने दोन कामगारांना जलसमाधी मिळाली. तिघे जण नदीकाठ गाठण्यात यशस्वी ठरल्याने बचावले. ही घटना रविवारी (१६ जुलै) दुपारच्या सुमारास घडली. रात्रीपर्यंत प्रशासन व स्थानिक पोलिसांकडून शोधकार्य सुरू होते.
श्रवणकुमार शाह (२०, रा. खानपूर, जि. सिवान, बिहार), संजयकुमार लालबाबू शहा (सिसवा, जि. सिवान, बिहार), अशी मृतक कामगारांची नावे आहेत. तर, शैलेंद्र शंकर प्रसाद (२५, रा. खजुहैटी, मांझी बिहार ), शेषनाथ अर्जुन कुमार (१९, रा. सिसवन, गंगापूर सिसवन, बिहार) व अमित कुमार श्रवण महतो (२०, रा. खानपूर, बड़हरिया, शिवान बिहार, ह. मु. भानेगाव) असे थोडक्यात वाचलेल्यांची नावे आहेत. वरील सर्वांनी भानेगाव येथील वेकोलिच्या कोळसा खाणीत श्रीहरी कृष्ण कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कामाला आले होते.
मृतक संजयकुमार, श्रवणकुमार व त्याच्या सहकाऱ्यांनी घटनेच्या दिवशी कन्हान नदीत मासे पकडण्याचा बेत आखला. नदीकिनारी पोहोचल्यानंतर पाणी कमी असल्याने पात्रात उतरले. मात्र, अचानक पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली. पाच जणांनी एकमेकांचे हात पकडून पुरेपूर वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, संजयकुमार व श्रवणकुमारचे हात निसटून ते वाहून गेले. तिघे नदीकाठावर पोहचले. घटनेची माहिती खापरखेडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून बुडालेल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्र झाल्याने शोधकार्यात अडथळा आला. शोधकार्यासाठी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. सोमवारी (१७ जुलै) सकाळी ही शोधमोहीम राबविण्यात येईल.
मयत दोघांसह शेषनाग कुमार शाह (२२), अमितकुमार शाह (२३) व शैलेंद्रकुमार शाह (२८) सर्व रा. बिहार असे पाच जण भानेगाव येथील वेकोलिच्या कोळसा खाणीत श्रीहरी कृष्ण कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कामाला आले होते. रविवारी सुटी असल्याने पाचही जण भानेगाव शिवारातील कन्हान नदीच्या पात्रात मासोळ्या पकडण्यासाठी गेले. मासोळ्या पकडत असताना संजयकुमार व श्रवणकुमार या दोघांचा तोल गेल्याने ते पाण्यात पडले आणि लगेच प्रवाहात आल्याने वाहून गेले. इतर तिघांना पोहता येत नसल्याने ते पाण्याबाहेर निघाले. दोघेही वाहून गेल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली.