चोपडा (प्रतिनिधी) कृषी विभागाने बुधवारी चोपड्यात स्वदेशी ५ या बियाण्यांची ९५ बनावट पाकिटे जप्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावर्षी बाजारात अंकुर कंपनीच्या स्वदेशी ५ हे बियाणेच उपलब्ध नाही. त्यामुळे या नावाने उपलब्ध होणारे सर्वच बियाणे हे बनावट असल्याने ते शेतकऱ्यांनी खरेदी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
चोपडा येथे २४ मे रोजी पहाटे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांना चोपडा शहराबाहेरील अग्रवाल पेट्रोल पंपाच्या बाजूला हॉटेल न्यू सुनीतामध्ये बनावट स्वदेशी ५ वा नावाच्या वाणाचा कापूस बियाणे साठा ठेवला असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी चोपड़ा पोलिसांच्या मदतीने हॉटेलमध्ये चौकशी केली. या वेळी संशयित संदीप आधार पाटील (रा. वहीं, ता. चोपडा) यांनी गाडी खराब झाल्याने दोन प्लास्टिकच्या पिशव्या भरून कापूस बियाणे हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती हटिलचे व्यवस्थापक अमोल राजपूत यांनी पोलिसांना दिली.
याप्रकरणी अरूण तायडे यांनी चोपडा पोलिस ठाण्यात बियाणे कायदा १९६६, महाराष्ट्र कापूस बियाणे नियंत्रण कायदा २००९, बियाणे नियंत्रण आदेश १९८३ अन्वये शासन व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आधार पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच बनावट स्वदेशी ५ या कापूस बियाण्यांची १ लाख रुपयांची ९५ पाकिटे जप्त केली आहेत. दरम्यान, अंकुर सिड्स कंपनीचे स्वदेशी ५ हे वाण यावर्षी विक्रीसाठी उपलब्धच नाही. हे वाण विजोत्पादन न झाल्याने कंपनीने बाजारात आणलेच नाही. बाजार या नावाने उपलब्ध होणारे वाण हे बनावट असल्याने ते कोणीही खरेदी करू नये, असे कृषि अधिकारी कार्यालयातर्फे कळवण्यात आले आहे. ही बियाणे हे रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष संदीप आधार पाटील (३५, रा. वर्डी, ता. चोपडा) याने विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि संतोष चव्हाण हे करीत आहेत.