धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बाभळे गावातील शेतात जाणारा रस्ता पावसामुळे खराब झाला होता. अशावेळी शेतकऱ्यांना तिथून येता जातांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे गावकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आपली समस्या मांडली होती. त्यावर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि युवा सेनेच्या माध्यमातून मुरूम टाकून शेतरस्ता तात्काळ तयार करून देण्यात आल्याने बाभळेकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
धरणगाव तालुक्यातील बाभळे गावातील शेत जमिनीमध्ये जाणे-येणे करण्यासाठी शेतात बैलगाडी -ट्रॅक्टरमधून शेती अवजारे, बी- बियाणे आणि रासायनिक खते नेण्यास अडचण निर्माण होत होती. ही बाब युवा सेनेचे कार्यकर्ते अमोल गजरे आणि रोहित पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मांडली. शेतरस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय त्रास सहन करावा लागत असल्याचे अमोल गजरे आणि रोहित पाटील यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी ही बाब प्रतापराव पाटील यांना सांगत समस्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश दिलेत. प्रतापराव पाटील यांनी लागलीच शेत रस्त्याच्या काम सुरु केले. युवा कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर तसेच जेसीबीने घेऊन धरणगाव येथून मुरूम आणून शेत रस्ता तयार करण्यासाठी मदत केली.
शेतात जाण्यासाठी मुरूम टाकून रस्ता तयार केल्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले तसेच लवकरच बाभळे फाट्यापासून शेतात जाण्यासाठी शेत पाणंद रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे. यावेळी अमोल गजरे, रोहित पाटील, जगदीश पाटील, दीपक पाटील, लीलाधर पाटील, नरेंद्र कुमार पाटील , अंबू मोतीराम पाटील, गणेश पाटील, राकेश पावरा आणि नंदुराम पावरा या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मदत केली.