छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) साई टेकडी परिसरात तरुणाच्या आढळून आलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडले असून चार वर्षे ‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या महिलेने आणि इतर चार जणांनी त्या रिक्षाचालकाला विवस्त्र करून बेदम मारहाण करत खून केल्याचे समोर आले आहे. आनंद साहेबराव वाहुळ (वय २७, रा. कबीरनगर, उस्मानपुरा), असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नेमकं काय घडलं !
आनंद हा रिक्षाचालक होता व त्याचे एका ४५ वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबध होते. दोघेही चार वर्षांपासून ‘लिव्ह इन’ मध्ये राहत होते. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद असल्याने आनंद हा मुंबईला होत कामाला निघून गेला होता. परंतु मागील आठवड्यात तो पुन्हा शहरात आला. महिलेला भेटण्यासाठी तिच्या चिकलठाणा परिसरातील घरी गेला. त्यावेळी माझा नाद सोड.. माझा मुलगा मोठा झाला आहे. त्याला ही बाब कळेल. वाद वाढतील, अशी विनंती महिलेने केली. मात्र तरी आनंद ऐकत नव्हता. शेवटी महिला व तिचा मुलगा व अन्य तीन आरोपींनी १३ डिसेंबर रोजी आनंदला विवस्त्र करून बेदम मारहाण करत दुचाकीवर नेऊन साई टेकडी परिसरात फेकून दिले. बेदम मारहाणीमुळेच आनंदचा मृत्यू झाला.
दोन दिवसांपूर्वी तक्रार !
आरोपी महिलेने आनंदच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात हा बळजबरीने घरात घुसतो, धिंगाणा करतो या आशयाची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार १३ डिसेंबरला देण्यात आली होती. त्यानंतर आनंद हा दिवसभर घरी न आल्याने त्याच्या आई-वडीलांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे गाठत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर गुरुवारी (दि.१४)ी त्याचा मृतदेहच आढळून आला होता.















