धरणगाव (प्रतिनिधी) राज्य कापूस पणन महासंघातर्फे आज धरणगाव येथे कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे. परंतू कार्यक्रम पत्रिकेतून चक्क धरणगाव नगराध्यक्षांसह अनेकांची नावे वगळली गेल्यामुळे राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष निलेश चौधरी हे तालुक्यातील सर्वात मोठे जिनिंग व्यावसायिकसह प्रगतशील शेतकरी आहेत. दुसरी धक्कादायक बाब म्हणजे खान्देश जिनिंग असोशियनचे उपाध्यक्ष तथा डायरेक्टर हे धरणगावचे असून देखील त्यांचीही नावं वगळण्यात आली आहेत.
राज्य शासनाने परवानगी दिल्यामुळे राज्य कापूस पणन महासंघाचा कापूस खरेदीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात पारोळा आणि धरणगाव येथे २८ नोव्हेंबर रोजी कापूस खरेदीला सुरुवात होत माहिती महासंघाचे संचालक संजय पवार यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानुसार पारोळा येथे शनिवारी सकाळी ११ वाजता कापूस खरेदी सुरू होईल. तर धरणगाव येथे दुपारी ४ वाजता कापूस खरेदीचा शुभारंभ होणार आहे. यासंदर्भात संजय पवार यांनी शुक्रवारी धरणगावच्या सोशल मीडियात कार्यक्रमाची पत्रिका टाकल्यानंतर वाद उफाळून आल्याची चर्चा आहे.
धरणगावच्या पत्रिकेत अनेकांची नावं आहेत. त्यात सर्व राजकीय पक्षासह पणन महासंघ व काही सामाजिक कार्यकर्त्यांची देखील नावांचा समावेश आहे. परंतू कार्यक्रम धरणगाव शहरात होत असल्यामुळे गावाचे प्रथम नागरिक तथा तालुक्यातील सर्वात मोठे जिनिंग व्यावसायिक म्हणून निलेश चौधरी यांचे नाव अपेक्षित होते. परंतू श्री. चौधरी यांचे नाव वगळण्यात आलं आहे. एवढेच नव्हे तर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांची नावं देखील कार्यक्रम पत्रिकेत नाहीत. एवढेच नव्हे तर माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, धरणगावातील राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन,दीपक वाघमारे यांचं देखील कार्यक्रम पत्रिकेत नाहीय. संबंधित लोकांच्या व्यतिरिक्त असंबंधित लोकांची नावं पत्रिकेत असल्यामुळे राजकीय गोटात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
राजकीय नेत्यांबरोबर धरणगावच्या कार्यक्रम पत्रिकेतून म्हणजे खान्देश जिनिंग असोशियनचे उपाध्यक्ष जीवनसिंग बयस व डायरेक्टर सुरेश नाना चौधरी यांचे देखील नावं वगळण्यात आली आहेत. थोडक्यात एखादं व्यक्तीने आपली राजकीय आणि व्यावसायिक सोय बघून पत्रिका छापल्याचा आरोप होत आहे. या कार्यक्रमाची वेळ देखील दोन वेळेस बदल्यायची चर्चा आहे. या कार्यक्रमानंतर अंतर्गत राजकीय वाद मोठ्या प्रमाणात उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, याबाबत पणन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ, शकला नाही.