नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोना संसर्गाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचा आकडा हा वाढताना दिसत आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तीन लाखांच्या पार पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत २ लाख २२ हजार ३१५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ४४५४ रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमावावे लागले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवार दिवसभरातील कोरोना आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत २ लाख २२ हजार ३१५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आकडेवारी घसरत असल्याचं यातून दिसून येत असून, त्यात आणखी एक दिलासा म्हणजे याच कालावधी देशात तीन लाख २ हजार ५४४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची देशातील एकूण संख्या २७ लाख २० हजार ७१६ वर आली आहे. तर एकूण रुग्णसंख्या २,६७,५२,४४७ इतकी झाली आहे.
नवीन कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिलासा देणारी असली, तरी देशात दररोज मृत्यू होत असलेल्या रुग्णांची संख्या झोप उडवणारी आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून दररोज चार हजारांच्या आसपास मृत्यू नोंदवले जात असून, गेल्या २४ तासांत चार हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. ४ हजार ४५४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाख तीन हजार ७२० इतकी झाली आहे.
२४ तासांत ‘या’ पाच राज्यांत सर्वाधिक रुग्णांची नोंद
सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात रविवारी सर्वाधिक रुग्ण तामिळनाडूमध्ये आढळून आले. तामिळनाडूत ३५ हजार ४८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यापाठोपाठ महाराष्ट्र २६ हजार ६७२, कर्नाटक २५ हजार ९७९, केरळ २५ हजार ८२० आणि आंध्र प्रदेशात १८ हजार ७६७ रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यातली स्थिती
महाराष्ट्रात रविवारी २९,१७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर २६,६७२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दुर्दैवाने काल ५९४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून घातलेल्या निर्बंधांचा चांगलाच परिणाम झाल्याचं समोर येत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहे. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे.