धरणगाव (प्रतिनिधी) जानेवारी महिन्यात वितरित होणाऱ्या स्वस्त धान्यात संपूर्ण राज्यभर कपात करण्यात आल्यामुळे गरीब लाभार्थी हवालदील झाले आहेत. थोडक्यात एकीकडे कोरोनाची तिसरी लाट सुरु झालीय आणि दुसरीकडे राज्य सरकार गरिबांची शत्रू बनली असल्याची टीका भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी केली आहे.
एकूण मागणीपैकी ८२.१९, तर तांदूळ ५९.९७ टक्केच प्राप्त
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना पत्र पाठवून गव्हात २०, तर तांदळाच्या वितरणात ४० टक्के कपात करण्याच्या सूचना केल्याचे कळते. धरणगाव शहर व तालुक्यात १०६ धान्य दुकानांव्दारे धान्य वितरण केले जाते. जानेवारी महिन्याचे धान्य नियतन दुकानदारांना वितरित केले जात असून, पुढील आठवड्यात ते कार्डधारकांपर्यंत पोहोचणार आहे. परंतू गव्हाच्या एकूण मागणीपैकी ८२.१९, तर तांदूळ ५९.९७ टक्केच प्राप्त झाला आहे. अंत्योदय कार्डधारक १७ हजार १०२ असून, प्रतिकार्ड २५ किलो गहू, तर १० किलो तांदूळ दिला जातो.
शिल्लक धान्याची माहिती न घेताच कपात
अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्य शिधापत्रिका धारकांनाही दरमहा गहू व तांदळाचे वितरण केले जाते. यात प्रतिव्यक्ती तीन किलो गहू, तर दोन किलो तांदूळ दिला जातो. धरणगाव तालुक्य अन्न सुरक्षा योजनेतील धान्य वितरणाचा लाभ ७ हजार ३४३ रेशनकार्ड धारकांना होतो. तर लाभार्थींची संख्या ९९ हजार ५१७ आहे. दुसरीकडे शिल्लक धान्याची माहिती न घेताच २० टक्के गहू, तर ४० टक्के तांदूळ कपात करण्यात आल्यामुळे लाभार्थींची मोठी गैरसोय होणार आहे.
स्वस्तधान्य दुकानदार सापडले संकटात
लाभार्थ्यांना मशीनमध्ये पूर्ण आलेला कोटा दिसेल. त्यामुळे धान्य कमी दिल्यावर लाभार्थी दुकानदाराला जाब विचारतील. त्यावर दुकानदार काय उत्तर देणार?. यातून दुकानाच्या तक्रारी तसेच दुकानावर मोठे वाद होण्याची शक्यता आहे. विरोध केला तर अधिकारी त्रास देतील आणि कमी धान्य दिले तर लाभार्थी…त्यामुळे ‘एकडे आड तिकडे विहीर’, अशा संकटात स्वस्तधान्य दुकानदार सापडले आहेत. याबाबत धरणगाव तहसीलदारांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
साखरही होणार गायब
प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना रेशनवरील साखर बंद करण्यात आली आहे. सध्या अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच साखर दिली जाते. परंतू जानेवारी महिन्यात राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना यंदा रेशनवर साखर मिळणार नाहीय. यामुळे देखील तीव्र नाराजी आहे.
धरणगाव तालुक्यातील जनता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील धक्क्यातून अद्याप सावरलेली नाहीय. तर तिसरी लाट नुकतीच सुरु झालीय आणि तशात सर्वसामान्यांना मिळणाऱ्या रेशनच्या धान्यातही कपात म्हणजे गरीबांचा जीव घेणारी ठरणार आहे. त्यामुळे गरिबांना संपूर्ण धान्य मिळाले पाहिजे, अन्यथा भाजप आंदोलन करेल.
-अॅड. संजय महाजन (भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष)