यवतमाळ (वृत्तसंस्था) मोबाईल रिचार्ज करण्यासाठी आजीने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याने संतप्त झालेल्या नातवाने ७४ वर्षाच्या आजीचा गळा दाबून खून केला. ही खळबळजनक घटना बाभूळगाव तालुक्यातील रेणकापूर येथे शनिवारी दुपारी २ वाजता घडली.
सिंधूबाई भरत पोवते (वय ७४) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा नातू महेश विश्वास पोवते (वय २५) याने आजीसोबत वाद घालून त्यांचा गळा आवळला. यात जागेवरच आजीचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सिंधूबाई यांची मुलगी सुधा मनोहर ठाकरे यांनी बघितला. या प्रकरणी सुधा ठाकरे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पोलिसांनी रविवारी अटक केली. दरम्यान, या प्रकरणात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. शवचिकित्सा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून रविवारी आरोपीला अटक केली.
नेमकं काय घडलं ?
महेश विश्वास पोवते याच्या मोबाईलचे रीचार्ज काही दिवसापासून संपलेले होते. रीचार्जसाठी पैसे नसल्यामुळे त्याने आपल्या आजीकडे पैश्यांची मागणी केली. मात्र आजीने त्यास नकार दिला. परंतू तरी देखील त्याने पैसे देण्यासाठी आजीकडे तगादा लावलेला होता. त्यानंतर शनिवारी महेशचा आजीचा सोबत वाद झाला. या वादातून राग अनावर झाल्यानंतर महेशने आजीची गळा आवळून खून केला. दरम्यान, मोबाईल रिचार्ज करण्यासारख्या शुल्लक कारणातून नातवाने आजीचा खून केल्यामुळे समाज मन सुन्न झाले आहे.