
धरणगाव (प्रतिनिधी) – येथील स्वामी समर्थ केंद्रातील महाराजांच्या मुकुटासह चोरट्यांनी दानपेटीतील रोख रक्कम, चिल्लर चोरून नेल्याची घटना १६ रोजी रात्री झाल्याचे उघडकीस आले आहे.
येथील स्वामी समर्थ मंदिरात सकाळी सेवेकरी महेश पाटील आले असता त्यांना केंद्राचे कुलूप तुटलेले दिसले, तसेच गर्भगृहातील तिजोरी मंदिराच्या दक्षिण भिंतीवर तुटलेल्या स्वरूपात दिसली. त्यात थोडी चिल्लर होती. या खोलीत सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर ठेवलेला होता. तो चोरट्यांनी तोडला. तर कुलूप समोरच ओट्यावर ठेवलेले होते. तर कोयंडा कटरच्या साह्याने कापल्याचे दिसून आले. दरम्यान, दर महिन्याला तिजोरीत ४० ते ५० हजार रुपये जमा होतात. मात्र, अधिक मासानिमित्त दानपेटीत जास्त रक्कम असल्याचे सांगण्यात आले. ४० हजार रुपये रोख, चिल्लर व सहा हजाराचे १७भार वजनाचे २चांदीचे मुकुट, चांदीच्या लहान सहा देवांच्या मूर्ती असा एकूण ४६ हजारांचा ऐवज चोरट्यांनी नेला आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात राजेंद्र पुंडलिक पाटील यांच्या माहितीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंतामण मोरया परिसरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, एकही चोरटयाला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक धास्तावले असून पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे. तपास पो.नि. उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संतोष पवार, महेंद्र बागुल, सुमित बाविस्कर, किशोर भोई, सत्यवान पवार करत आहेत.
















