लातूर (वृत्तसंस्था) औसा-तुळजापूर महामार्गावरील हॉटेल साईप्रसाद जवळ भरधाव वेगात आलेल्या कारने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तीन शिक्षकांसह चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली.
औसा-तुळजापूर महामार्गावरून रिकामे ट्रॅक्टर गुरुवारी रात्री औसाकडे येत होते. त्याच वेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील कारने जोराची धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा पूर्ण भाग चक्काचूर झाला होता. या कारमधील खरोसा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक संजय बाबुराव रणदिवे (५२), जयप्रकाश मोतीराम बिराजदार (४५), महेबूब मुनवरखान पठाण (४५) गाडीचा चालक राजेसाब न्हनू बागवान (३४) यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी मदतकार्य केले. मयताचे शवविच्छेदन औसा ग्रामीण रुग्णालयात करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शिवली येथे बोकडाचे मटण चविष्ट मिळत असल्याने तिन्ही शिक्षकांनी मटणाचा बेत आखला होता. पण नियतीने त्यांना या अपघातात कायमचे हिरावून घेतल्याने शिवलीचे हे जेवण त्यांच्या आयुष्यातील शेवटचे ठरले. किल्लारी, खरोसा आणि विळेगावात शोककळा पसरली होती. अपघातस्थळाचे दृश्य भयानक होते. मृतदेह काढण्यासाठी क्रेन, कटर, जेसीबीचा वापर करावा लागला.