नाशिक (वृत्तसंस्था) कपडे धुण्यासाठी के. टी. बंधाऱ्यावर गेलेल्या दोघी मैत्रिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चिंचविहिर (ता. नांदगाव) येथे घडली. पूजा अशोक जाधव ( वय १६) व खुशी देवा भालेकर (वय १६) असे मयत मुलींची नावे आहेत.
पूजा जाधव व तिची मैत्रिण खुशी भालेकर व कावेरी भालेकर या तीन मैत्रिणी दिवाळी निमित्ताने कपडे धुण्यासाठी चिंचविहीर तांड्याजवळील के. टी बंधाऱ्यावर गेल्या होत्या. त्यातील पूजा व खुशी या दोघींचा पाय घसरुन त्या पाण्यात पडल्या. त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी कावेरी भालेकर हीदेखील पाण्यात उतरली. मात्र तीही पाण्यात बुडू लागली. मुलींचा आरडाओरड ऐकून ही घटना आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
काही नागरिकांनी पाण्यात उतरून तिघींना बेशुद्धावस्थेत अवस्थेत पाण्यातून बाहेर काढले. उपचारासाठी त्यांना तत्काळ नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील पूजा जाधव व खुशी भालेकर (रा. चिंचविहीर तांडा) या दोघींना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले, तर कावेरी भालेकर हीचा जीव वाचला. तिला पुढील उपचारार्थ मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेने चिचविहीर तांड्यासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी नांदगाव पोलीसांत नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज वाघमारे तपास करीत आहेत.