जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत बँकेचे कर्ज तातडीने सुरू करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदानद्वारे केली आहे.
ॲड. जमील देशपांडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आचारसंहिता सुरू झाल्यापासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँके अंतर्गत होणारा कर्ज पुरवठा बंद असल्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना व्यवसाय करता कर्ज मिळणे गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे. सदर कर्ज पुरवठा जिल्हा उद्योग केंद्र व राष्ट्रीयकृत बँक यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे दिला जातो. मात्र जिल्हा उद्योग केंद्र मार्फत कर्जाचे अर्ज स्वीकारण्याचे काम आचारसंहितेपासून बंद असल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्ह्यामध्ये १३ मे २०२४ रोजी निवडणुका संपल्या असून जळगाव जिल्ह्यातील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे कर्जपुरवठा तातडीने सुरू करावा. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत जे प्रस्ताव दाखल केले जातात त्याची वेबसाईट शासनामार्फत बंद केलेली आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून कर्ज प्रकरणाचे प्रस्ताव स्वीकारण्याचे आदेश जिल्हा उद्योग केंद्राला द्यावे, अशी देखील मागणी ॲड. जमील देशपांडे यांनी केली आहे.