धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदेड फाट्याजवळ धरणगावला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईनचा व्हॉल लिकेज झाल्यामुळे आज लाखो लिटर पाणी गेले. परंतू लिकेजचे पाणी शेतात शिरल्यामुळे काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी दिला आहे.
सावखेडा येथून धरणगावला पाणी पुरवठा करणारी ४०० एम.एमची पाईप लाईनवरील व्हॉल लिकेज झाल्यामुळे आज सकाळी लिकेज पाण्याचा मोठा फवारा सुरु झाला. यामुळे बघता-बघता लाखो लिटर पाणी वाया गेले. अति उच्च दाबामुळे पाण्याची वेग जास्त होता हे पाईपलाईनमधून हवेत उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यावरुन स्पष्ट होत होते. पाण्याचा वेग जास्त असल्याने पाणी शेतात घुसले आणि त्यामुळे पिकाचे झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे कर्मचारी,अधिकाऱ्यांनी पाईपलाईन दुरुस्तीसाठी घटनास्थळी धाव घेत व्हॉल दुसरुस्त केला. याबाबत लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी सांगितले की, पाणी लिकेज होत असल्याची माहिती मिळाल्याबरोबर दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच यामुळे धरणगावच्या पाणी पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाहीय.
दुसरीकडे भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी पालिका प्रशासनावर टीका करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, अन्यथा भाजप आंदोलन करेल असा इशारा दिला आहे. तसेच पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे कायमच पाईप लाईन नादुरुस्त होत असते. पालिकेतील सत्ताधारी तकलादू काम करून बिल काढून कमिशन घेत असल्यामुळे नित्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते. त्यामुळेच वारंवार पाईप लाईन फुटते किंवा लिकेज होत असल्याचा आरोप देखील संजय महाजन यांनी केला आहे.