धरणगाव (प्रतिनिधी) शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी मागील वीस ते पंचवीस दिवसापासून दिवस-रात्र धावडा येथे मुख्य पाईप लाईनमधील गाळ काढण्याच्या ठिकाणी ठाण मांडून आहेत. त्यांच्या या परिश्रमाला यश आले असून लवकरच धरणगावातील प्रत्येक वार्डात पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी दिली आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी हे गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून दिवस-रात्र धावडा येथील गाळ काढण्याच्या ठिकाने ठाण मांडून आहेत. गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे. नगराध्यक्ष निलेश चौधरी या ठिकाणी स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न करत आहेत. धावडा येथील मुख्य पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साठलेला होता. हा गाळ काढण्याचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. परंतू पाईप लाईनमध्ये एका वेळी एकच व्यक्तीला जाता येत असल्यामुळे गाळ काढण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. गाळ काढून साधारण पाचशे फुटाची पाईपलाईन सुरळीत करायची आहे. आतापर्यंत ८० टक्के गाळ काढण्यात आलेला आहे. येत्या तीन ते चार दिवसात हे काम पूर्ण देखील होणार आहे. दरम्यान पिंप्री येथील अंजनी व धावडा नदीचे पाणी मुबलक असल्याने धरणगावकरांना आठ दिवसानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. त्याठिकाणी १३५ हॉर्स पॉवरचे पंपाने पाण्याचा उपसा सुरु आहे. गाळ काढण्याचे काम पूर्ण होते तोपर्यंत अंजनी नदीपात्रातून पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहील. लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी स्वत: दिवसरात्र मेहनत घेतल्यामुळे धावडा येथील काम पूर्ण झाले की, आठ दिवसाआड पाणीपुरवठा रोटेशन प्रमाणे धरणगावकरांना मिळणार आहे.