
भडगाव (प्रतिनिधी) – शहरातील यशवंतनगर भागात जुन्या वादाची ठिणगी पडून एका महिलेवर हमालीसाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी हुकने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना १२ जूनला रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. भडगावातील यशवंतनगर भागातील रहिवासी कविता सुरेश पाटील आणि त्यांच्या घरासमोरच राहणारे अस्लम बिस्मिल्ला शेख व त्यांची पत्नी शमीन अस्लम शेख यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत. १२ जूनला रात्री ९ वाजेच्या सुमारास याच वादाचे पर्यावसन महिलेवर जीवघेणा हल्लात झाले. संशयितांनी कविता पाटील यांना आपल्या घरात बोलवून घेतले आणि वाद वाढल्यानंतर हमालीसाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी हुकसदृश वस्तूने त्यांच्यावर हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, कविता पाटील यांच्या गळ्यासह शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्या आहेत. या हल्ल्यानंतर कविता पाटील या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस पाटलांनी तातडीने धाव घेत त्यांना भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारार्थ जळगावातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जखमी महिलेची सून राधा सागर पाटील यांनी भडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अस्लम बिस्मिल्ला शेख आणि त्याची पत्नी शमीन अस्लम शेख यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. तर, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रभारी पो.नि. राहुल पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सुशील सोनवणे तपास करत आहेत.
















