पुणे (वृत्तसंस्था) पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पुण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. ‘त्यांच्यावर सव्वा रूपयाचा दावा लावलाय आणि मी कोणताही दावा हरत नाही हे विसरू नका. त्यांच्याकडून सव्वा रुपया घेतल्या शिवाय राहणार नाही’ असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
संजय राऊत बोलत असताना यावेळी कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात चंपा चंपा म्हणून एकच घोषणाबाजी केली. राऊत म्हणाले की, ‘मी कशाला त्यांचा चंपा म्हणू? ते माझे चांगले राजकीय मित्र आहे. ते माजी म्हणू नका, असं म्हणत असतील तर भावी म्हणू. त्यांची आणि माझी चांगली मैत्री आहे. पण, त्यांच्यावर सव्वा रूपयाचा दावा लावलाय आणि मी कोणताही दावा हरत नाही हे विसरू नका. त्यांच्याकडून सव्वा रुपया घेतल्या शिवाय राहणार नाही. मी कोणताही खटला हरत नाही. दोन वर्षांपूर्वी तुम्हाला हरवून दाखवलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवला आहे, असं म्हणत राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.
‘आपलं सरकार असलं तरी शेवटी ठोकून काढणं हा आपला मूळ स्वभाव आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीहून परत आले आहे. ते अमित शहांना भेटले असले तरी काळजी नसावी, हे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल याची मी शाश्वती देतो. भाजपने कितीही आदळआपट केली तरी ठाकरे सरकारला धोका नाही, असंही राऊत म्हणाले.