जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पहूर येथे एका ३५ वर्षीय विवाहितेने संतापाच्या भरात राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पहूर पेठ अंतर्गत असलेल्या संतोषीमाता नगरात राहणाऱ्या प्रिया राजेंद्र नवघरे (वय ३५) या विवाहितेने राहत्या घराच्या वरील मजल्यावर साडीचा गळफास तयार करून संतापाच्या भरात जीवनयात्रा संपविली.
यासंदर्भात अधिक असे की, प्रिया नवघरे या नेहमीप्रमाणे स्वयंपाकाची तयारी करत होत्या. काही कामासाठी त्या घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत गेल्या. मात्र दहा- पंधरा मिनिटे होऊनही आई खाली का येत नाही? हे पाहण्यासाठी मुलगी वैष्णवी वरच्या खोलीकडे गेली. मात्र घराचा दरवाजा व खिडकी आतून बंद असल्याने तिने आजी कुसुमबाई नवघरे यांना आवाज दिला. आजी कुसुमबाई आणि वैष्णवी यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून कडी लावलेली असल्याने त्यांना दरवाजा उघडता येत नव्हता. त्यांच्या या आवाजाने पती राजेंद्र नवघरे वर आले. त्यांनीही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात शेजारील प्रशांत विठ्ठल कुमावत यांनी धाव घेऊन दरवाजा जोरात ढकलल्याने आतील कडी उघडल्या गेली.
आत प्रवेश करताच प्रिया ही साडीचा गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. हे दृष्य पाहताच सर्वांना एकच धक्का बसला. आईची ही स्थिती पाहून वैष्णवीने टाहोच फोडला. आजूबाजूचे लोक मदतीसाठी एकत्र आले. घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत घटनास्थळी दाखल झाले. ताबडतोब प्रिया यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पहूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत प्रिया यांच्या पश्चात पती, मुलगी वैष्णवी (वय १४ ), दोन मुले पियुष (वय ११) आणि साई (वय ९) सासू -सासरे असा परिवार आहे.