जळगाव (प्रतिनिधी) – कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात वाद होवून एकमेकांना लोखंडी रॉडसह काठीने बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये दोन्ही गटातील तीन ते चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना दि. १ मे रोजी रात्री १० वाजता जळगाव पाळधी नवीन हायवेच्या पुलाखाली घडली. याप्रकरणी दोन्ही गटाविरुद्ध परस्पविरोधात तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील हरिओम नगरातील रतिलाल संतोष सोनवणे (वय ३२) हा दि. १ मे रोजी रात्री त्याचा मित्र मयुर लहासे, खुशाल वालकर, हर्षल कोळी, भूषण सोनवणे, अजय सोनवणे व आनंदा विसपुत यांच्यासोबत पाळधी येथे जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून ते दुचाकीने घरी परतत असतांना खुशाल वालकर याने फोन करुन त्यांच्या दुचाकीला चारचाकीने ठोस मारली असून तुम्ही लवकर या असे कळविले. त्यानुसार सर्वजण कानळदा रोडवरील पुलाखाली पोहचले. या अपघातात मयूर लहासे व खुशाल वालकर हे दोघ जखमी झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
लोखंडी रॉड टाकला डोक्यात
रतिलाल सोनवणे यांनी तेथे असलेल्या फैजल शेख सलीम व अफान शेख यांना अपघाताबाबत विचारले असता, त्यांच्यात वाद होवून दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर फैजल शेख याने त्याच्या हातातील लोखंडी रॉड रतिलाल यांच्या डोक्यात मारला तर अफान शेख याने स्टीलच्या शॉकअपने हर्षल कोळी व आनंदा विसपुते यांना मारहाण करुन गंभीर जखमी केले.
उपचारानंतर दिली तक्रार
परिसरातील नागरिकांनी भांडण सोडविल्यानंतर जखमी रतिलाल सोनवणे याला उपचरार्थ रुग्णालयात दाखल केले. त्याने दिलेल्या जबाबावरुन संशयित फैजल शेख सलीम बळीराम पेठ,अफान शेख अफसर (रा. बळीराम पेठ) याच्यासह दोन अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गुलाब माळी हे करीत आहे.
तरुणासह त्याच्या आजोबाला लाकडी काठीने मारहाण कार आणि दुचाकीच्या अपघात झाल्यामुळे विचारपूस करीत असल्याच्या कारणावरुन वाद होवून, चौघांनी फैजल शेख कलीमोद्दीन (वय २२, रा. इस्लामपुरा, भवानीपेठ) याला लाकडी काठीने मारहाण केली. तसेच त्याच्या आजोबांना देखील शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी संशयित मयुर लहासे, खुशाल वालकर, मुन्ना पहलवान, रतिलाल सोनवणे (सर्व रा. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















