चाळीसगाव (प्रतिनिधी) – रेल्वे वाहतूक अधिक कार्यक्षम व सुसूत्र करण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलत चाळीसगाव येथे रेल ओव्हर रेल (आरओआर) उड्डाणपुल प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. सुमारे २६३.८६ कोटी खर्चाच्या या प्रकल्पामुळे मध्य रेल्वेच्या गर्दीच्या या मार्गावरील ताण कमी होणार आहे.
सध्या चाळीसगाव परिसरात तीन मार्गावरील अनेक क्रॉसिंगमुळे रेल्वे वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. विशेषतः धुळे बाजूकडून येणाऱ्या गाड्यांना मुख्य मार्ग ओलांडताना वारंवार विलंब सहन करावा लागतो. त्यामुळे गाड्यांचा वेग कमी होऊन संपूर्ण रेल्वे ऑपरेशनमध्ये गुंतागुंत वाढते.
याशिवाय या विभागात चौथा मार्ग विकसित होत असल्याने भविष्यात वाहतूक आणखी वाढण्याची शक्यता आहे. यातच विद्यमान व्यवस्था अपूर्ण पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर मंजूर करण्यात आलेला सुमारे १०.७५ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल रेल्वे मार्गाचे विभाजन करून विविध दिशेने जाणाऱ्या गाड्यांची हालचाल स्वतंत्रपणे होईल, अशा पद्धतीने उभारण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी होणारे मार्गसंघर्ष पूर्णपणे टळून गाड्यांची हालचाल अखंड व वेगवान होणार आहे. चाळीसगाव ते जामदा दरम्यानचा मार्ग सध्या लांब ब्लॉक सेक्शनमुळे ओळखला जातो. या प्रकल्पामुळे मार्गांची पुनर्रचना होऊन गाड्यांचा प्रवाह सुरळीत होणार असून स्थानकावरील थांब्याचा वेळही कमी होणार आहे. अप दिशेला सुमारे १५ मिनिटे तर डाउन दिशेला सुमारे २० मिनिटांची बचत होण्याचा अंदाज आहे.
या प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे ११.०१ किलोमीटर असून कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने याबाबत सर्वेक्षण केले आहे. प्रकल्पांतर्गत दोन नवीन स्थानक इमारती, एक मोठा पूल, १६ लहान पूल, एक रस्त्याखालचा पूल तसेच पाच मर्यादित उंचीचे भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहेत. मार्गाची रचना १:२०० उतारानुसार असून ताशी १३० किमी वेगाने गाड्या धावण्यास तो सक्षम असेल.
भविष्यातील वाढती मागणी पूर्ततेसाठी निर्णायक ठरेल प्रकल्प सध्या विभागाची वहन क्षमता ४५.४ टक्के असून आगामी काळात ती १०७.९६ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भविष्यातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प निर्णायक ठरणार आहे. दरवर्षी सुमारे ०.६ दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तर साखर, सिमेंट उद्योग तसेच औद्योगिक क्लस्टर्सना याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. चाळीसगावातील हा रेल्वे उड्डाणपूल प्रकल्प वाहतूक सुलभ करण्यासह प्रादेशिक आर्थिक विकासाला गती देणारा ठरणार आहे.
















