अमरावती (वृत्तसंस्था) जागेच्या वादातून आई-वडिल व मुलावर सब्बलने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आई व मुलाचा मृत्यू झाला. तर वडील गंभीर जखमी झाले. ही खळबळजनक घटना सोमवार, २९ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर येथे घडली. कुंदा विजय देशमुख (६६) व सूरज विजय देशमुख (३२) असे मृतक आई व मुलाचे विजय देशमुख (७०) असे जखमी वडिलाचे नाव आहे. घटनेनंतर पसार झालेल्या मारेकऱ्याला पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने काही तासातच चोर माहुली येथून अटक केली. या दुहेरी हत्याकांडाने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
देवानंद श्रीकृष्ण लोणारे (४५) असे अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्याचे नाव आहे. विजय देशमुख व देवानंद लोणारे हे दोघे आपल्या कुटुंबासह मंगलधाम परिसरातील बालाजीनगर येथे शेजारी राहतात. त्या दोघांच्या घरांमध्ये थोडीशी खुली जागा आहे. या जागेवरून विजय देशमुख व देवानंद लोणारे यांच्या कुटुंबात वाद सुरू होता. सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास याच कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद उद्भवला. या वादात देवानंद लोणारे याने घरातून सब्बल आणून अचानक सूरज यांच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे विजय व कुंदा हे दोघे मुलगा सूरज याला वाचवायला गेले. त्यावर देवानंदने त्यांच्यावरही सब्बलने हल्ला चढविला.
यामध्ये कुंदा, सूरज व विजय हे तिघेही गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. त्याचवेळी देवानंद तेथून पसार झाला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून गंभीर जखमी विजय, कुंदा व सूरज यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी कुंदा व सूरजला यांना मृत घोषित केले. तर विजय यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती मिळाल्यावर पोलीस उपायुक्त सागर पाटील व कल्पना बारवकर, साहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी ठसे तज्ञ, श्वान पथक व फॉरेन्सिकच्या चमूलाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी देवानंदविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. घटनेनंतर काही तासात त्याला अटक करण्यात विशेष पथकाला यश आले.