
जळगाव (प्रतिनिधी) – महामार्गावरुन जाणाऱ्या चौघांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील ७ हजार ८०० रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना दि. ११ जून रोजी मध्यरात्री महामार्गावर घडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तालुका पोलिसांनी तपासचक्रे फिरवित पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार चेतन उर्फ बटाटा रमेश सुशिर (वय २१), उमाकांत दत्तात्रय जाधव (वय दोघ रा. संत मिराबाईनगर), गौरव संजय जाधव (वय २१, रा. साईनगर) व रोशन भगवान पाटील (वय २६, रा. पांडुरंग नगर) यांना दोन तासात अटक केली आहे.
धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे हॉटेलवरील मॅनेजर असलेले चेतन प्रकाश पाटील हे दि. १० जून रोजी मध्यरात्री १ वाजता हॉटेल बंद करुन (एमएच १९, डीजे ०८७०) क्रमांकाच्या दुचाकीने घरी जात होते. महामार्गावरील हॉटेल साई गार्डन समोर ते लघुशंका करण्यासाठी थांबवले. यावेळी पाळधीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारसह दोन दुचाकीस्वार त्यांच्याजवळ थांबले. त्यातील एकाने चेतन पाटील यांच्या पोटाला चाकू लावून मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील ४ हजार ८०० रुपयांची रोकड त्यांनी जबरदस्तीने हिसकावून घेतली. घाबरलेल्या चेतन पाटील यांनी संशयितांच्या तावडीतून सुटका करुन घेत ते एका ठिकाणी लपून बसले. त्यानंतर संशयित हे त्यांची वाहने घेवून तेथून पसार झाले.
एकाच रात्रीत चौघांना लुटले
मध्यरात्री चेतन पाटील यांनी पोलीस ठाण्यात जावून घडलेली घटना कथन केली. परंतू ते घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यांनी रात्री तक्रार ने देता दुसऱ्या दिवशी सकाळी तक्रार देण्याकरीता पोलिसात गेले. यावेळी त्यांना मध्यरात्री साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास किशोर लक्ष्मण कोळी (रा. बांभोरी, ता. जळगाव), भूषण पंडीत महाजन (रा. श्रीराम कॉलनी) व परेश अशोक अमृतकर (बांभोरी, ता. धरणगाव, ह.मु. साईनगर) यांना देखील चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोकड जबरीने हिसकावून नेली.
















