मुंबई (वृत्तसंस्था) काल गुरुवारी आयकर विभागाने अजित पवारांच्या तीन बहिणींशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. लखीमपूरची तुलना जालियनवाला बागच्या घटनेशी केल्यामुळे हे जे काही चाललंय ते सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी माध्यांशी बोलताना ही शक्यता व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशच्या लखिमपूर खीरी प्रकरणावर माझ्यासह काही विरोधकांनी तीव्र भूमिका घेतली. त्यामुळं महाराष्ट्रात जे काही घडलं त्याचं हे कारण असू शकतं, असं शरद पवार स्पष्टपणे म्हणाले. “शेतकरी त्यांची भूमिका मांडायला जात असताना सत्ताधारी पक्षातील एका घटकाची वाहनं त्यांच्या अंगावरून जातात. त्यात ६ ते ७ लोकांचा मृत्यू होतो. हे यापूर्वी कधी घडलं नव्हतं. साहजिकच याचा तीव्र निषेध सर्वांनी केला. महाराष्ट्र सरकारनंही मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचा निषेध केला. मीही यावर तीव्रपणे बोललो,” असं पवार म्हणाले. शेतकऱ्यांवर जो हल्ला झाला त्याची तुलना मी जालियनवाला बागच्या घटनेशी केली. त्याचा संताप किंवा राग सत्ताधारी पक्षांना आला आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून हे जे काही चाललंय ते सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं ते म्हणाले.
सरकारला एखाद्या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आहे. पण संबंधित व्यवहारांशी संबंध नसलेल्या कुटुंबातील सदस्यांची, मुलींची चौकशी करणं हा अधिकारांबाबतचा अतिरेक आहे, असं पवार म्हणाले. अशाप्रकारे अधिकारांचा गैरवापर कितीदिवस सहन करायचा हे लोकांनी ठरवायचं आहे. काही लोक वेडीवाकडी भाषणं, आरोप करून बोलतात आणि ते बोलल्यानंतर केंद्रीय संस्था संबंधित कार्यवाही करण्यासाठी पुढं येतात, हे सर्वांत आक्षेपार्ह असल्याचंही पवार म्हणाले.