
पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे शेताच्या वहीवाटाच्या कारणावरून झालेल्या वादात एका शेतकऱ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रतिलाल पेलाद जाधव यांची वसंतनगर तांडा शिवारात शेती आहे. ३ जून रोजी दुपारी सुमारे २ वाजता ते आपल्या कापूस पिकाला ठिबक सिंचनाद्वारे पाणी देत होते. यावेळी मोटार बंद करण्यासाठी गेले असता तेथे तुकाराम प्रयाग जाधव, देवकाबाई तुकाराम जाधव,संदीप तुकाराम जाधव आणि राजेश तुकाराम जाधव उपस्थित होते.
दरम्यान, शेतातील रस्त्याच्या वहीवाटीवरून त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. ऋतुम्ही आमच्या शेतातून तुमच्या शेतात जाऊ नका, असे सांगितल्यावर रतिलाल जाधव यांनी माझा रस्ता याच मार्गाने आहे, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर संबंधितांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. वाद चिघळल्यानंतर संदीप तुकाराम जाधव याने कोयत्याने रतिलाल जाधव यांच्या डोक्यावर वार केल्याने ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. शेतात उपस्थित असलेल्या त्यांचा पुतण्या रोहित आत्माराम जाधव याने त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यांना धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
या प्रकरणी रतिलाल जाधव यांनी शनिवारी पारोळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तुकाराम प्रयाग जाधव, देवकाबाई तुकाराम जाधव, संदीप तुकाराम जाधव आणि राजेश तुकाराम जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
















