मालेगाव, प्रतिनिधी — रावळगाव येथील एस. जे. शुगर (SPICA – Green Energy & Agro) कारखान्याच्या गळीत हंगाम २०२५–२६ मधील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, मालेगाव, सटाणा तालुक्यातील शेकडो उस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत देयकांबाबत आज अपर जिल्हाधिकारी कार्यालय, मालेगाव येथे आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस देवदत्त केकाण (अप्पर जिल्हाधिकारी, मालेगाव), संजय गोंडे (उपसंचालक, साखर, अहिल्यानगर), नितीन सदगिर (उपविभागीय अधिकारी, मालेगाव), विशाल सोनवणे (तहसीलदार, मालेगाव), प्रशांत मोहिते (जनरल मॅनेजर, रावळगाव साखर कारखाना – SPICA ग्रीन एनर्जी), शिवाजी देसाई (शेती अधिकारी, रावळगाव साखर कारखाना – SPICA ग्रीन एनर्जी), माधवराव पंडित पाटील (शेतकरी प्रतिनिधी, रा. गुढे, ता. भडगाव), दरबारसिंग गुलाबसिंग राजपूत (ऊसतोड मुकादम प्रतिनिधी, रा. शिरपूर), समाधान पंडितराव माळी (वाहतूक मुकादम प्रतिनिधी) यांच्यासह शेकडो शेतकरी व मुकादम उपस्थित होते. तसेच बंडूकाका बच्छाव (नेते, भाजपा मालेगाव) आणि अमोल चव्हाण (पदाधिकारी, भाजपा चाळीसगाव) आदी उपस्थित होते.
बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रलंबित देयकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक शेतकऱ्यांनी कारखान्याने मागील वर्षाचे १५० रुपये प्रति टन प्रमाणे फरक देण्याचे आश्वासन देऊन यावर्षी ऊस गाळप केला, मात्र नोव्हेंबर – डिसेंबर २०२५ पासून आजतागायत एक रुपया देखील कारखान्याकडून देण्यात आला नाही, अशी नाराजी व्यक्त केली. कष्ट करून, घाम गाळून ऊस पिकविला व त्याचेच पैसे घेण्यासाठी आम्हाला भिकाऱ्यासारखे कारखान्याच्या चकरा माराव्या लागतात. मुलीच्या लग्नासाठी उसनवारी करावी लागली, सोसायटी पीककर्ज थकीत ठेवावे लागल्याचे सांगितले. मात्र कारखाना प्रशासन नीट उत्तरे देत नाही, फोन उचलत नाहीत अशा तक्रारी यावेळी शेतकऱ्यांनी केल्या.
ऊस तोडणी मुकादम यांनीदेखील आमच्या मजुरीचे लाखो रुपये कारखान्याने थकवल्याने शेवटी व्याजाने पैसे काढून मजुरांना देयके द्यावी लागली असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकरी व मुकादम यांच्या भावनांशी न खेळता विहित मुदतीत थकीत देयके द्या, अन्यथा शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास होणाऱ्या विपरीत परिणामास कारखाना प्रशासन जबाबदार राहील, असा सज्जड दम दिला. त्यानंतर कारखाना संचालक मोहम्मद हारून शेख यांनी आमदार चव्हाण यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांच्या अनुषंगाने मान्यता देत दिलेल्या तारखांमध्ये देयके अदा करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
कारखाना प्रशासनाकडून खालीलप्रमाणे तारखेसहित आश्वासने देण्यात आली:
१) गळीत हंगाम २०२५–२६ मधील उस उत्पादक शेतकऱ्यांचे उर्वरित देयके दि. ०३/०५/२०२६ पर्यंत अदा करण्यात येतील.
२) गळीत हंगाम २०२४–२५ मधील उस उत्पादक शेतकऱ्यांना भाव फरक दि. १५/०५/२०२६ पर्यंत देण्यात येईल.
३) उस तोडणी मुकादम तसेच वाहतूक कंत्राटदार यांचे प्रलंबित देयके दि. १५/०५/२०२६ पर्यंत देण्यात येतील.
बैठकीअंती सर्व चर्चेनुसार निर्णय जाहीर करण्यात आले असून, शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
अन त्या शेतकरी महिलेच्या चेहऱ्यावर फुलले हास्य…
चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील महिला शेतकरी आशाबाई पोपट चौधरी यांना सदर बैठकीबाबत माहिती मिळाली असता त्या देखील मालेगाव येथे बैठकीसाठी उपस्थित होत्या. २०२१ पासून त्यांचे ६० हजार रुपये एस. जे. शुगर रावळगाव कडे थकीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सदर शेतकरी महिला आशाबाई चौधरी यांचे थकीत देयक अदा करण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना बैठकीत उपस्थित उपसंचालक (साखर) यांना दिल्या. तसेच मदतीचा हात म्हणून वैयक्तिक १० हजार रुपयांची मदत आशाबाई चौधरी यांना दिली. २०२१ पासून अनेकवेळा कारखान्याकडे चकरा मारूनही उपयोग झाला नाही, मात्र मंगेशदादांनी मला न्याय मिळवून दिला, अशी भावना यावेळी आशाबाई चौधरी यांनी व्यक्त केली.

















