
भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील कुऱ्हा गावाजवळ मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात वरणगावातील २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने समोरून रिक्षेला जबर धडक दिल्याने घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर, कारचालकाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी वरणगावातील सिद्धेश्वर नगरमधील प्रकाश जुलाल गायकवाड (वय ५७) यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील मनीष अदिनाथ संघवे (वय ४३) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला मनीष संघवे हा महिंद्रा कंपनीची कार (एमएच १९, सीव्ही- ७०८१) ने भरधाव वेगाने जात होता. त्याचवेळी समोरून येणाऱ्या रिक्षा (एमएच- २०, ईके- ३४४०) ला या कारने जबर धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षाचालक हर्षल प्रकाश गायकवाड (वय २८, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना
तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, वरणगाव परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारचेही नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. तर ही माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात कारचालक मनीष संघवे याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. नीलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात हवालदार धिरज मंडलीक करत आहेत.
















