भिवंडी (वृत्तसंस्था) शहराची तहान भागवणारा वऱ्हाळा तलाव मृत्यूचा सापळा बनत असल्याची चर्चा सुरू असतानाच या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी समोर आली आहे. या घटनेने शांतीनगर परिसरात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे. गुलाम मुस्तफा अन्सारी (१३), शेख साहील पीर मोहमद (१०) आणि दिलबर रजा शमशुल्ला (१२ तिघेही रा. शांतीनगर, पिराणी पाडा) अशी बुडून मृत पावलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत.
मृत तिघेही शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील पिरानी पाडा परिसरातील वेगवेगळ्या कुटुंबात रहमत मदिना मशिदीजवळ राहत असून, तिघेही मित्र आहेत. बुधवारी रोजी दुपारी १ ते दीड वाजताच्या सुमारास हे तिघेही घराबाहेर खेळण्यासाठी निघाले होते. मात्र, बराच वेळ होऊनही तिघेही घरी न परतल्याने तिघांच्याही कुटुंबीयांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देताच पोलिसांनी तिघांना अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याबाबत गुन्हा नोंदवला होता, तर पोलिसांनी गुरुवारी सकाळपासून या तिघांचा शोध सुरू केला असता, मृतांपैकी गुलाम याचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी स्थानिकांना वऱ्हाळा तलावात दिसून आला. त्यानंतर भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने अन्य दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता त्यांचाही मृतदेह रात्री उशिरा सापडला. तर हे तिघेही पोहण्यासाठी वहऱ्हाळा तलावात गेल्याची माहिती आहे.
दरम्यान, त्यांना तलावातील खोलीचा अंदाज न आल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तीनही मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून येथील शासकीय स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनाकरता पाठवले आहेत. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.