धरणगाव प्रतिनिधी- प्रज्ञासूर्य, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासात खंबीर साथ देणाऱ्या, त्याग व संघर्षाचे प्रतीक असलेल्या सत्यशोधिका माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धरणगाव शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूरज वाघरे यांनी केले. याप्रसंगी नगराध्यक्षा लीलाताई चौधरी, आर डी महाजन, विनय भावे, दिपक वाघमारे, नगरसेविका प्रमिलाताई शिरसाठ, कांतीलाल पाटील, के आर वाघ, समीर भाटिया, गोपाल पाटील, हेमंत माळी, गोरखनाथ देशमुख, सूरज वाघरे, महेंद्र भैय्या महाजन, नाना बागुल, नगरसेवक विलास महाजन, गुलाबराव मराठे, आनंद पाटील, बुट्या पाटील, सुजित वाघरे, कॉन्ट्रॅक्टर मोहन महाजन, श्याम अहिरे, रवींद्र वखरे, बाळासाहेब जाधव, महेंद्र तायडे, वाल्मीक पाटील, नंदलाल महाजन, आप्पा मोरे, निलेश मोरे, निलेश पवार, अरविंद चौधरी आदींनी माल्यार्पण करून अभिवादन केले. तद्नंतर उपस्थित मान्यवरांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा गौरव करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजक्रांतीच्या वाटचालीत रमाई यांनी मौनात राहून अपार दुःख, उपेक्षा व संघर्ष सहन केला. गरिबी, आजारपण आणि सामाजिक अन्याय यांचा सामना करतानाही त्यांनी बाबासाहेबांच्या ध्येयधोरणांवर अढळ विश्वास ठेवून कुटुंबाचा भार समर्थपणे पेलला. त्यांच्या संयमशील स्वभावामुळे व त्यागमय जीवनामुळेच बाबासाहेबांना समाज परिवर्तनाचे महान कार्य अखंडपणे करता आले. स्त्रीशक्ती, मातृत्व, सहनशीलता आणि निःस्वार्थ त्याग यांचे जिवंत प्रतीक असलेल्या माता रमाई आंबेडकर यांचे जीवन आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ असल्याचे यावेळी सांगण्यात आले. माता रमाई यांनी केवळ एका महापुरुषाच्या जीवन साथीदाराची भूमिका निभावली नाही, तर समाजपरिवर्तनाच्या लढ्यात स्वतःला झोकून देत एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या जीवनकार्याची आठवण करून देणारी ही जयंती सामाजिक समता, न्याय आणि मानवतेच्या मूल्यांची जाणीव करून देते, असे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्यामकांत अहिरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राजेंद्र वाघ यांनी मानले.















