अहमदनगर (वृत्तसंस्था) ड्युटीवर असताना मोबाइलचा वापर कसा करायचा?, आता राज्य सरकारने मोबाईल वापरासंबंधीच्या शिष्टाचारासंबंधीही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना मोबाइलवाचून जमत नाही तसेच मोबाईल वापरताना देखील माफक शिष्टाचार देखील पाळले जात नसल्याने या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
यासंबंधीचे परिपत्रक सर्व विभागांना पाठविण्यात आले आहे. सुलभ व वेगवान संपर्क म्हणून मोबाइलचा वापर अपरिहार्य बनला आहे. मात्र, त्याचा वापर करताना शिष्टाचार पाळणे आवश्यक असल्याने या सूचना देण्यात आल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. सोशल मीडियाच्या वापरासंबंधी आणि एकूणच वेळेसंबंधीही यात महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत. या केवळ शिष्टाचारासंबंधीच्या सूचना आहेत. त्यांचे पालन न केल्यास काय कारवाई होणार, याचा स्पष्ट उल्लेख परिपत्रकात नाही त्यामुळे नव्याने परिपत्रक काढून कारवाईचा बडगा ठेवल्यासच याचे पालन होईल, हे देखील स्पष्ट आहे .
काय आहेत नवीन मार्गदर्शक सूचना ?
सरकारी कार्यालयीन कामासाठी कार्यालयात असलेला दूरध्वनीचा (लँडलाईन) प्राधान्याने वापर करावा. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच मोबाइलचा वापर करावा. मोबाइलवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. आपल्या बाजूला इतरही उपस्थित आहेत, याचाही विचार करावा. मोबाइलवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे, असंसदीय भाषेचा वापर करू नये, वाद घालू नये. कार्यालयीन कामासाठी शक्यतो एसएमएसचा वापर करावा, बोलायचे झाले तरी कमी वेळेत बोलावे. मोबाइलवर व्यस्त असताना लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कॉल्सला तात्काळ उत्तर द्यावे. मोबाइलवर समाजमाध्यमांचा (सोशल मीडिया) वापर करताना वेळेचे व भाषेचे तारतम्य बाळगावे. अत्यावश्यक वैयक्तिक मोबाइल कॉल आपल्या कक्षाच्या बाहेर जाऊन घ्यावेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मोबाइल सायलेंट मोडवर ठेवण्यात यावा. त्यावेळी एसएमएस तपासणे, एअर फोन वापरणे वगैरे टाळावे. कार्यालयीन कामासाठी दौऱ्यावर असताना आपला मोबाइल बंद ठेवू नये.