
अमळनेर (प्रतिनिधी) – मागील भांडणाच्या कारणावरून तालुक्यातील खवशी येथे दोन गटांमध्ये झालेल्या तुफान दंगलीत चाकू, लोखंडी सळई, फायटर आणि काठ्यांचा सर्रास वापर केल्याने दोन्ही गटांतील ७ जण जखमी झालेत. ही घटना १३ जूनला रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन्ही गटांतील एकूण ११ जणांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खवशी येथील सीमा अशोक पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा पुतण्या प्रतीक जगतराव पवार हा १३ जूनला गुरांना पाणी पाजण्यासाठी सार्वजनिक हाळावर गेला होता. त्याचा दर्शन भूषण गोसावी, भूषण सुरेश गोसावी आणि दीपक उर्फ कांतीलाल सुरेश गोसावी यांच्याशी मागील भांडणाच्या कारणावरून वाद झाला. त्यावेळी शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली होती. तर, गावातील नागरिकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. मात्र रात्री साडेनऊ वाजता सीमा पवार या घरासमोर ओट्यावर बसलेल्या असताना दीपक, भूषण, दर्शन, कल्याणी कांतीलाल गोसावी, रुपाली भूषण गोसावी तसेच त्यांच्या सोबत खेडी, नांद्री, अमळगाव, अमळनेर व गांधली येथील सुमारे २० ते २५ जण आल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. या वेळी जातीवाचक आणि अश्लील शिवीगाळ सुरू झाल्यानंतर सुलभा दिनकरराव पवार व शालुबाई जगतराव पवार या महिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भूषण गोसावी याने चाकूने सुलभा पवार यांना मारहाण करून खाली पाडल्याचा आरोप – केला आहे. तसेच दीपक गोसावी याने शालुबाई पवार यांच्या डाव्या हाताच्या बोटावर चाकूने वार केला, तर दर्शन गोसावी याने सीमा पवार यांच्या तळहातावर चाकूने वार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. आरडाओरडा झाल्यानंतर जगतराव मधुकर पवार, दिनकर मधुकर पवार आणि प्रतीक पवार हे भांडण सोडवण्यासाठी आले असता काही अनोळखी व्यक्तींनी प्रतीक याला धरून ठेवून त्याच्यावर फायटर व काठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या मारहाणीत जखमी झालेल्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गोसावी कुटुंबातील ५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास डीवायएसपी विनायक कोते करत आहेत.
दरम्यान, दुसऱ्या गटातील दर्शन भूषण गोसावी यांनीही अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ते, त्यांचे वडील भूषण गोसावी आणि काका दीपक गोसावी हे प्रतीक पवारच्या वडिलांना त्याच्या वर्तनाबाबत समजावण्यासाठी गेले असता वाद निर्माण झाला. या वेळी शालुबाई पवार व सीमा पवार यांनी भूषण गोसावी याची कॉलर पकडली, तर दर्शन गोसावी याला खाली पाडले. त्यानंतर जगतराव पवार यांनी लाकडाने भूषण गोसावी यांच्या पाठीवर व मानेवर मारहाण केली. प्रतीक पवारने दर्शनच्या डोक्यात वीट मारली, तर राज अनिल शिरसाठ याने लोखंडी सळईने डोक्यावर वार केल्याचे तसेच दगडू नाना शिरसाठ यांनीही लोखंडी सळईने मारहाण केल्याचे नमूद केले आहे.
भांडण सोडवण्यासाठी आलेल्या दीपक गोसावी यांनाही मारहाण करून जखमी केले. गावकऱ्यांनी हस्तक्षेप करून भांडण थांबवल्यानंतरही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रतीक पवार, जगतराव पवार, राज शिरसाठ, दगडू शिरसाठ, शालुबाई पवार आणि सीमा पवार यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास हे. कॉ. विजय भोई करत आहेत.
















