भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाणे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या धडक कारवाईमुळे संपूर्ण पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. एका गुन्ह्यात अटक टाळून चॅप्टर केस करण्यासाठी तब्बल ३० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला असून अखेर २० हजार रुपयांत तडजोड झाल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. या प्रकरणात बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजू सांगळे तसेच त्यांचा खासगी पंटर सलीम कुरेशी (रा. बोदवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील एका व्यक्तीविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. संबंधित प्रकरणात अटक टाळून केवळ चॅप्टर कारवाई करण्यासाठी उपनिरीक्षक राजू सांगळे यांनी सुरुवातीला ३० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने रक्कम जास्त असल्याचे सांगितल्यानंतर चर्चेनंतर अखेर २० हजार रुपयांवर व्यवहार निश्चित झाल्याचे समोर आले आहे. मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी थेट जळगाव एसीबीकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
तक्रार प्राप्त होताच एसीबीने संपूर्ण प्रकरणाची गोपनीय पडताळणी सुरू केली. प्राथमिक चौकशीत लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट होताच एसीबीच्या पथकाने सापळा रचला. एप्रिल २०२६ मध्ये तक्रारदाराला ठरल्याप्रमाणे रक्कम देण्यासाठी पाठविण्यात आले. मात्र, शेवटच्या क्षणी उपनिरीक्षक व त्यांच्या पंटराला संशय आल्याने प्रत्यक्ष रक्कम स्वीकारण्यात आली नाही. तरीदेखील एसीबीने केलेल्या ध्वनिमुद्रण, संभाषण पडताळणी व इतर तांत्रिक तपासात लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तपासाचा अंतिम अहवाल शुक्रवारी प्राप्त होताच जळगाव एसीबीचे पथक तातडीने भुसावळात दाखल झाले. या कारवाईत खासगी पंटर सलीम कुरेशी याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे उपनिरीक्षक राजू सांगळे हे सध्या आजारपणाच्या रजेवर असल्याचे सांगितले जात असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस विभागातील अंतर्गत कार्यपद्धती, खासगी पंटरांचा वाढता हस्तक्षेप आणि काही अधिकाऱ्यांचे कथित आर्थिक व्यवहार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
ही धडक कारवाई जळगाव एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, निरीक्षक रेश्मा अवतारे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बाजारपेठ पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
या कारवाईमुळे भुसावळ शहरात मोठी चर्चा रंगली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर यापूर्वीही अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोऱ्या, घरफोड्या, सट्टा-मटका, अवैध धंदे तसेच गुन्हेगारीवर प्रभावी कारवाई होत नसल्याबाबत नागरिकांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. काही सामाजिक संघटनांनी देखील पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर उघडपणे टीका केली होती. अशातच आता लाचखोरीच्या या गंभीर प्रकरणामुळे बाजारपेठ पोलीस ठाण्याची प्रतिमा पुन्हा एकदा मलिन झाली आहे.
















